निगेटिव्ह बोलणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना चंद्रकांत पाटील यांनी सुनावले , जेवा आणि घरी जा …
मावळ : मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी आज समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबीच घातली. महायुतीच्या बैठकीत निगेटिव्ह बोलणाऱ्यांनी जेवून घरी जावं, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्यांना निगेटिव्ह बोलायचं त्यांनी माझ्या कानात बोलावं. जाहीर निगेटिव्ह बोलणाऱ्यांनी तातडीनं जेवणाचा मेनू पाहावा आणि जेवून घरी जाऊन बसावं. तसेच इथून बाहेर गेलातचं, तर मीडियामध्ये ही अजिबात निगेटिव्ह बोलायचं नाही, असे त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, दिवसभर मीडियात दिसलं की तुम्हाला मज्जा येते. यापेक्षा निगेटिव्ह बोलणाऱ्यांनी इथून जेवून तातडीनं घरी जावं, मी त्यांना तशी परवानगी देतो आहे. निगेटिव्ह बोलणाऱ्यांचे असे कान टोचत पाटलांनी भरपूर बोला, पण पॉझिटिव्ह बोला असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
मोदी उमेदवार आहेत असे समजून काम करावे – उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार आहेत असे समजून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. उद्धव ठाकरे यांनी कधीच कार्यकर्त्यांची दुःखे जाणून घेतली नाही. स्वतःचा चेहरा देखील कोणाला दाखवत नव्हते. मावळमध्ये सहाही आमदार महायुतीचे आहेत. या आमदारांच्या मताधिक्याची बेरीज केल्यास बारणे हे मागील वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील. गट-तट, मान – अपमान विसरून जा. मानसन्मान बाजूला ठेवून काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उमेदवार कोण आहे याच्याशी देणे घेणे नाही – अनिल पाटील
मंत्री अनिल पाटील म्हणाले की, देशाच्या विकासासाठी आम्ही भाजपसोबत आलोय. उमेदवार कोण आहे, याच्याशी काही देणे घेणे नाही. नेत्याने घेतलेल्या निर्णयासाठी झोकून देऊन काम करावे. आमदार सुनील शेळके म्हणाले की, मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची लढत झाली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार आपल्या अगोदर जाहीर झाला आहे. त्यांचा एक दौरा पूर्ण झाला आहे. आपण पाठीमागे आहोत. महायुती म्हणून आपल्याला संयुक्तपणने बूथ प्रमुखांची बैठक घेतली पाहिजे.