MarathaAndolanNewsUpdate : शिवाजी महाराज , बाबासाहेबांशी केलेल्या तुलनेबद्दल मनोज जरांगे यांनी दिली ही प्रतिक्रिया …
औरंगाबाद : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीकरता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला आहे. या लढ्याचा परिणाम म्हणून कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढला आहे त्यामुळे सोशल मिडीयावार काही तरुणांनी जरांगे पाटलांची तुलना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. यासंदर्भातील अनेक लेख, ग्राफिक्स सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. या तुलनेला आंबेडकरी तरुणांकडून विरोध होत आहे .
यासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी आज जालन्यातील खासगी रुग्णालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आपली प्रतिक्रिया दिली. डॉ.बाबासाहेबांनी समाजाला न्याय मिळवून दिला, त्यामुळे त्यांच्याशी तुमची तुलना केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुमची तुलना करतात. ही तरुणांची भावना आहे. या तरुणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना विचारण्यात आला होता.
यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की , “हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. मी कोणात ढवळाढवळ करणार नाही. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा सेवक आहे. सर्वसामान्यांचा सेवक आहे. कारण ते रक्त आपल्यात आहे. “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच या देशाला दिशा मिळाली. त्यांच्या विचारांशिवाय वंचितांना न्याय मिळू शकत नाही. ते विचार घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय माणसाची किंवा एखाद्या समूहाची प्रगती होणार नाही. नाहीतर प्रगती खुंटलीच म्हणून समजा”, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
आंदोलनात सातत्य राहील …
समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आमच्या आंदोलनात सातत्य राहणार असून डिसेंबरपासून प्रत्येक गावागावात पुन्हा महाराष्ट्रभर साखळी उपोषण शांततेत सुरू करायचं आहे. महाराष्ट्र दौऱ्याबाबत आज कार्यक्रम आखला जाईल. आपण पुन्हा एकदा मराठा समाजाचा आशीर्वाद घ्यायला जायचं आहे. २४ डिसेंबर आरक्षणाची अंतिम तारीख आहे. तर दौरा उद्या-परवापासूनच सुरू होणार आहे .न्यायाचा दिवस जवळ आला आहे. शेतीतले कामे करत असताना आपल्या लेकरांच्या भविष्याचा विषय डोक्यात ठेवायचा आहे”, असंही मनोज जरांगे म्हणाले.
कायदा-सुव्यवस्था राखा, आत्महत्या कारू नका …
मराठा तरुणांना उद्देशून ते म्हणाले की , “आपण बेमुदत उपोषण स्थगित केलं असलं तरीही आताही आंदोलन चालू आहे. आंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण चालू आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय ते थांबणार नाही. पुन्हा एक विनंती आहे की उद्रेक किंवा कायदा मोडेल असं कृत्य करायचं नाही. कुणीही आत्महत्या करता कामा नये ”, असेही ते म्हणाले.