MarathaAndolanNewsUpdaate : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण मागे, आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध : मुख्यंमत्री
अंतरवाली सराटी (जालना): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती यावेळी पाहायला मिळत आहे. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे.
आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले , मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देणं ही आमची जबाबदारी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण हे सकल मराठा समाजासाठी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संदीपान भुमरे, राजेश टोपे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांचीदेखील उपस्थिती होती. शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक केलं आहे.
लाठीचार्जची घटना दुर्दैवी
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की , पहिल्या दिवसापासून सहकाऱ्यांनी पाठिंबा दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. शासनाची भूमिका स्पष्ट आहे. यापूर्वी सरकारने मराठा समाजाला 16 आणि 17 टक्के आरक्षण दिलं होतं. पण सुप्रीम कोर्टात ते आरक्षण दुर्दैवाने रद्द झालं. आपल्याला मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. लाठीचार्जची घटना दुर्दैवी आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफीही मागितली आहे . मराठा समाज अत्यंत शिस्तप्रिय आहे. शांतता बिघडेल असं तुम्ही कधी काम केलं नाही. मराठा समाजाकडून अनेक जण शिकले” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी देखील आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे. विशेष म्हणजे आमरण उपोषण मागे घेतलं असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचं जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.