RahulGandhiNewsUpdate : राहुल गांधी यांचा वायनाड दौरा निश्चित…
वायनाड : लोकसभेत अविश्वास ठरावावरुन चर्चा झाल्यानंतर आणि चार महिन्यांनंतर खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल गांधी १२ आणि १३ ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघाचा म्हणजेच वायनाडचा पहिला दौरा करत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर हा भारतातील लोकांचा आणि वायनाडच्या जनतेचा विजय असल्याचे काँग्रेसने म्हटले होते त्यानुसार राहुल गांधी आपल्या मतदारसंघातील मतदारांना भेटण्यासाठी जात असून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरुवात करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या नंतर राहुल गांधी यांचा जनसंपर्क वाढलेला असून यानिमित्ताने त्यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यानच्या काळात सुरत न्यायालयाने मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी काढून घेण्यात आली होती. त्यावरून काँग्रेसने देशभरात भावनिक वातावरण तयार केले होते. न्यायालयानेही वायनाडच्या जनतेचा उल्लेख केला होता. हाच धागा धरून राहुल गांधी वायनाडला आपल्या मतदार संघात जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. ज्या वायनाडच्या जनतेने राहुल गांधींना निवडून आणून लोकसभेत पाठवले होते, त्या जनतेचा आदर भाजपने केला नाही. त्यामुळेच वायनाडमधील जनतेची मने जिंकून घेण्याचा आणि एक राजकीय संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने राहुल गांधी करणार आहेत.