Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParliamentNewsUpdate : सरकार विरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत आज दिवसभरात काय झाले ?

Spread the love

नवी दिल्ली :  विरोधकांनी मोदी सरकारविरोधात मणिपूरच्या मुद्द्यावरून आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज दुपारी १२ वाजल्यापासून चर्चा सुरू झाली. या चर्चेतील पाहिले भाषण राहुल गांधी यांचे असेल असे म्हटले जात होते परंतु काँग्रेसने आपली रणनीती बदलून ज्यांनी हा प्रस्ताव दाखल केला त्या खा. तरुण गोगई यांनी आपल्या पहिल्या भाषणाला सुरुवात केली.

यावेळी आपला मुद्दा मांडताना , काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, ‘पंतप्रधानांना हे मान्य करावे लागेल की त्यांचं डबल इंजिन सरकार, मणिपूरमधील त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये १५० लोकांचा मृत्यू झाला. सुमारे ५००० घरे जाळली गेली, सुमारे ६०,००० लोक मदत शिबिरात आहेत आणि सुमारे ६५०० एफआयआर नोंदवले गेले आहेत. ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संवादाचे, शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला हवे होते, त्यांनी चिथावणीखोर पावले उचलल्याने समाजात तणाव निर्माण झाला.

खासदार गोगोई पुढे म्हणाले की, “पंतप्रधान मोदी केवळ मणिपूरवरच नव्हे तर अदानी मुद्द्यावरही मौन बाळगून आहेत. चीनबाबतही मौन सोडले नाही. पंतप्रधान मोदी त्यांची चूक मान्य करत नाहीत. दरम्यान अदानींच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर भाजप खासदारांनी गोंधळ घातला.

डिंपल यादव यांचा हल्लाबोल

समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला. महिलांवरील अत्याचाराबाबत चर्चा होत असताना उत्तर प्रदेशचीही चर्चा व्हायलाच हवी. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार यूपीमध्ये दर तीन तासाला एका महिलेवर शारीरिक अत्याचार होत आहेत. डबल इंजिन सरकार याची दखल घेत नसल्याची टीका त्यांनी केली. मणिपूरची घटना ही किरकोळ घटना नाही. ही अतिशय संवेदनशील घटना आहे. हे सरकार अहंकारी सरकार आहे. मणिपूरमधील घटनेचा जगभरातून निषेध होत आहे. भारतातील लोकांचे डोके शरमेने झुकले आहे. हे राज्य पुरस्कृत हिंसाचार असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.  मणिपूर सरकारने ठरवले असते तर मणिपूरमधील  हिंसाचार दोन ते तीन दिवसांत  आटोक्यात आणता आला असता. मात्र सरकारचा हेतू योग्य नाही. पंतप्रधान मोदी संपूर्ण जगाला आपले कुटुंब म्हणतात मग मणिपूर हे आमचे कुटुंब नाही का? मग मणिपूरला सावत्र आईची वागणूक का दिली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळे यांनी गाजवली संसद

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपले मुद्दे संसदेत मांडले. त्या म्हणाल्या की, भाजपने ९ वर्षात ९ सरकारे पाडली. सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा पाढा वाचून काढताना त्या म्हणाल्या की,  महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारचे मोठं अपयश आहे.

दरम्यान संसद टीव्हीच्या चॅनलखाली चालणाऱ्या मजकुरावर विरोधकांनी जोरदार आक्षेप नोंदवला. भाजपकडून संसदेत निशिकांत दुबे जेव्हा पहिल्यांदा बोलण्यास उभे राहिले तेव्हा विरोधाकांनी गोंधळ केला. कारण संसद टीव्हीत अविश्वास प्रस्तावाची चर्चा सुरू असताना खाली सरकारच्या आजवरच्या कामगिरीचे टिकर चालत होते. त्याबद्दल विरोधकांनी आक्षेप नोंदवला, जोपर्यंत ते टिकर हटवले जात नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज बंद राहील अशी भूमिका विरोधकांनी घेतली.

मणिपूरच्या हिंसाचारावर बोलतांना सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातल्या कारभाराचे वाभाडे यानिमित्ताने सभागृहात काढले. मुख्यमंत्री यांनी घरी बसून काम करण्याचा एक रेकॉर्डच केला अशी टीका त्यांनी केली. तर खासदार अरविंद सावंत यांनी नंतर पळपुट्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका तर करत त्याला प्रत्युत्तर दिलं. श्रीकांत शिंदे महाराष्ट्रातल्या राजकारणावरुन बोलत असताना समोरच्या बाकावरुन त्यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचं चँलेज आले, त्यावर त्यांनी सभागृहातच हनुमान चालिसा ऐकवली. शिंदे – ठाकरे गटाच्या या जुगलबंदीत नंतर भर पडली ती नारायण राणे यांच्या भाषणाने. राज्यसभेचे सदस्य असले तरी केंद्रीय मंत्री या नात्याने  त्यांना भाषणाची संधी दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी संसदेतली भाषणे  ऐकून महाराष्ट्राच्या विधानसभेत असल्यासारखे वाटत  आहे असे म्हणत नंतर त्यांनी शिवसेना, ठाकरे या विषयावरच आपली तोफ डागली. खा. नवनीत राणा यांनीही आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले.

काँग्रेसने रणनीती बदलली

दरम्यान आजच्या अविश्वास ठरावाचे पहिले भाषण राहुल गांधी करतील अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, राहुल गांधी यांनी भाषण केले नाही. राहुल गांधी यांच्या भाषणाबाबत काँग्रेसकडून अचानक रणनीतीमध्ये बदल करण्यात आला. पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नसल्याने राहुल गांधी यांनी पहिले भाषण केले नाही. ज्या दिवशी मोदी सभागृहात असतील त्याच दिवशी राहुल गांधी भाषण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर एनडीएकडे ३३२ चे संख्याबळ आहे. त्यामुळे या सरकारला धोका नसला तरी सभागृहातल्या चर्चेला मात्र सरकारला अखेर सामोरे जावे लागणार आहे. मणिपूरच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदी बोलायला तयार नसल्याने या अविश्वास प्रस्तावाची रणनीती काँग्रेस आणि विरोधकांकडून आखली गेली आहे. मणिपूरच्या मुद्दयावर अनेक दिवसांपासून संसदेत गदारोळ सुरु होता. विरोधक पंतप्रधानांच्याच उत्तरासाठी आग्रही होते. अविश्वास प्रस्तावावर उत्तर पंतप्रधानांनाच द्यावे लागेल असा आग्रह विरोधकांनी धरला आहे. याला पंतप्रधानांकडून जोरदार उत्तर दिले जाईल असे म्हटले जात आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!