CongressNewsUpdate : राहुल गांधी आता पूर्वोत्तर राज्यात काढणार भारत जोडो यात्रा तर महाराष्ट्रातही काँगेस उत्साही…
मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी पहिली ‘भारत जोडो यात्रा’ काढल्या नंतर आता दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी गुजरात ते ईशान्य भारतातील मेघालयपर्यंत ही पदयात्रा काढणार असल्याची तर राज्यात काँग्रेसनेते पदयात्रा काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पहिल्या टप्प्यात राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर असा सुमारे ४ हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला होता. यानंतर आता राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.
पटोले म्हणाले की, “राहुल गांधींच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेची सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातही आम्ही पदयात्रा काढणार आहोत. पूर्व विदर्भात माझ्या नेतृत्वात पदयात्रा काढली जाणार आहे. तर पश्चिम विदर्भात आमचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पदयात्रा काढणार आहेत.
उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात, मराठवाड्यात अशोक चव्हाण, पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईत वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघणार आहे.
दरम्यान कोकणातील पदयात्रेत आमच्या पक्षाचे सर्वच नेते सहभागी होतील. असे आमच्या पदयात्रेचे नियोजन असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.
महाराष्ट्रात ‘बस यात्रा’
पदयात्रा झाल्यानंतर राज्यात सुरू होणाऱ्या ‘बस यात्रे’दरम्यान महाराष्ट्रातील आमचे सर्व नेते एकत्र असतील. प्रत्येक ठिकाणी आमच्या सभा होतील. या यात्रेत आम्ही लोकांशी चर्चा करणार आहोत. लोकांच्या अडचणी समजून घेणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कमतरता लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत. हे सरकार कशाप्रकारे शेतकरी, युवक आणि गरीबांच्या विरोधात आहे. हे सरकार कशाप्रकारे लोकशाही संपवू पाहत आहे, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत.
या यात्रेच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्रात मोठे परिवर्तन पाहायला मिळेल असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.