CongressNewsUpdate : भारत जोडो यात्रेच्या दरम्यान काँग्रेस अध्यक्षपदावर राहुल गांधी यांनी दिली प्रतिक्रिया …
कन्याकुमारी : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी पक्षप्रमुखपदाच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर नसल्याचे संकेत दिले. काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल म्हणाले, “मी काँग्रेसचा अध्यक्ष होणार की नाही, हे पक्षाच्या निवडणुका झाल्यावर स्पष्ट होईल. याबाबतचा अधिक तपशील न देता ते म्हणाले, “मी निर्णय घेतला आहे. मी अगदी स्पष्ट आहे, जेव्हा पक्षाच्या निवडणुका होतील तेव्हा मी उत्तर देईन. या संभाषणादरम्यान भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले कि, “सर्व संस्था आता भाजपच्या ताब्यात असून त्यांचा वापर विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केला जात आहे.”
पंतप्रधानांसाठी माझ्याकडे कुठलाही संदेश नाही …
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा शुक्रवारी तिसरा दिवस आहे. राहुल गांधी यांनी आजच्या पदयात्रेला तामिळनाडूतील नागरकोइल येथून सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत ११९ नेत्यांसह समर्थकांची मोठी गर्दी आहे. या यात्रेच्या दरम्यान ‘काँग्रेसला वाचवण्यासाठी यात्रा काढली जात असल्या’च्या आरोपावर ते म्हणाले, “भाजप-आरएसएस त्यांचे मत मांडायला मोकळे आहेत, पण आम्ही ही ‘यात्रा’ लोकांशी जोडण्यासाठी करत आहोत. राहुल गांधी म्हणाले कि , ‘भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आम्ही देशातील समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कि, ग्राउंड लेव्हलवर देशात काय चालले आहे आणि त्याचवेळी भाजप-आरएसएसने केलेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता ? यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले कि , ” माझ्याकडे त्यांच्यासाठी कोणताही संदेश नाही.”
…तर १७ ऑक्टोबरला होई मतदान
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि तेव्हापासून राहुल यांच्या आई सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. थरूर आणि मनीष तिवारी, जे केंद्रीय मंत्री होते, ते जी -२३ नेत्यांमध्ये होते ज्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून “समावेशक नेतृत्व” मागितले होते. त्यानंतर ‘जी -२३’ मधील काही नेत्यांनी पक्ष सोडला असून, या यादीत ताजे नाव आहे ते गुलाम नबी आझाद यांचे. काँग्रेस सोडल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पहिल्या प्रतिक्रियेत राहुल गांधींवर निशाणा साधला होता. राहुल हे वरिष्ठ नेत्यांना भेटतही नाहीत, असे ते म्हणाले होते. त्यांनी ९ वर्ष दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. दरम्यान त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कौतुक केले पण त्यांनी (सोनिया) राहुल गांधींच्या चुकांकडे दुर्लक्ष केल्याचेही सांगितले.२४ सप्टेंबरपासून काँग्रेस अध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करता येईल आणि एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.