IndiaNewsUpdate : “…तर आम्ही त्यांना कन्याकुमारीमधील तिन्ही समुद्रात फेकून देऊ” , रामदास आठवले यांचे ” त्या ” मुख्यमंत्र्यांना कडक उत्तर
नवी दिल्ली : भाजपा सरकारला हटवून बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची गरज आहे, असे वक्तव्य करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना भाजपच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कडक उत्तर दिले आहे. “जर ते भाजपाला बंगालच्या उपसागरात फेकून देऊ असे म्हणत असतील तर, आम्ही देखील त्यांना कन्याकुमारीमधील तिन्ही समुद्रात फेकून देऊ,” असे आठवले यांनी म्हटले आहे.
काल केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी निराशा व्यक्त करत मोदी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरदृष्टी नसलेले नेतृत्व असून देशात नेतृत्व बदलाची गरज असल्याचे सांगून या विषयावर लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. दरम्यान, राव यांच्या टीकेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
#WATCH | "Telangana CM's statement of throwing BJP into the Bay of Bengal isn't good. We will also drown them into the 3 oceans from Kanyakumari," says MoS Social Justice & Empowerment Dr. Ramdas Athawale pic.twitter.com/47H2FzMZj9
— ANI (@ANI) February 2, 2022
आपल्या प्रतिक्रियेत चंद्रशेखर राव यांनी भाजपाला बंगालच्या उपसागरात फेकून देण्याचे वक्तव्य केले होते. त्यावर आपली कडक प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले कि , ” त्यांनी असं वक्तव्य करणे योग्य नाही. जर ते भाजपाला बंगालच्या उपसागरात फेकून देऊ असे म्हणत असतील तर, आम्ही देखील त्यांना कन्याकुमारीमधील तिन्ही समुद्रात फेकून देऊ.”
“या देशाला नेमकी कशाची गरज आहे, यावर आम्ही विचार करू आणि कामाला सुरुवात करू. आपला देश मजबूत आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. जिथे गरज असते, तिथे आपला देश प्रतिक्रिया देतो. भारतात बदलाची गरज आहे, क्रांतीची गरज आहे. जोपर्यंत आपण लढत नाही तोपर्यंत आपल्या देशात बदल होणार नाही,” असे चंद्रशेखर राव म्हणाले होते.