DeepaliChavhanSuicideCase : आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात संशयित अधिकाऱ्यांना ‘क्लिन चीट’
अमरावती : आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात वन विभागाने नेमलेल्या नऊ सदस्यीय समितीने अधिकाऱ्यांना क्लिन चीट दिली आहे.मनोधर्य खचल्याने दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला. दरम्यान सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी राव यांनी वन अधिकाऱ्यांना क्लिनचीट दिल्याने चौकशी समितीचा अहवाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
सहा महिन्यांपूर्वी २५ मार्च रोजी मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (वय ३२) यांनी सर्व्हिस रिव्हाल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. चव्हाण यांच्या जवळून सुसाईट नोट पोलिसांना मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आला. दीपाली यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत डिएफो विनोद शिवकुमार हे आत्महत्येस कारणीभूत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते. शिवाय मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांनी तक्रार केल्यानंतर देखील शिवकुमार यांच्यावर कारवाई न केल्याचे नमूद होते. त्यानंतर वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीकडून चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या ९ सदस्यीय समितीकडून १६ मुद्यांवर चौकशी करण्यात आली. हे प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच गाजले होते.
दरम्यान नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कामकाज चालले.नऊ सदस्यीय समितीत सह अध्यक्ष म्हणून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, वन विकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा अय्यर, अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, मेळघाटच्या वनअधिकारी पियुषा जगताप, अमरावती वन विभागाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, सेवानिवृत्त वनअधिकारी किशोर मिस्री कोटकर त्याचप्रमाणे सदस्य सचिवांनी स्वयंसेवी संस्थेचा एक सदस्य या समितीत समावेश होता.