MaharashtraPoliticalUpdate : कोरोनाच्या नावाने राज्यातील पोनीवडणूका अखेर लांबणीवर

मुंबई: अखेर कोरोना संसर्गाची दुसरी लाट , संभाव्य तिसऱ्या लाटेचा आणि डेल्टा प्लस विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांवरून गेले काही दिवस राज्यात राजकारण चांगलेच तापले होते. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जाहीर झालेल्या या निवडणुकांना भाजपकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर तातडीने तोडगा काढण्यात यावा. त्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, यासाठी भाजपकडून सातत्याने आग्रह धरण्यात आला होता. त्याचवेळी सरकारमधील छगन भुजबळ यांच्यासह काही मंत्र्यांनीही निवडणुका स्थगित कराव्यात अशी भूमिका घेतली होती. विधानसभेच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातही आरक्षणाच्या मुद्द्यावरून वादळ उठलं होते. या पार्श्वभूमीवर आता या निवडणुकाच स्थगित झाल्याने काही काळ तणाव काहीसा निवळण्याची शक्यता आहे.
या बदलाच्या संदर्भात अधिक माहिती देताना मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु ७ जुलै रोजी राज्य शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-१९ बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथील करण्यात आली आहे. कोविड-१९ ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.