UnlockMaharashtraUpdate : उद्यापासून राज्यात कुठे ” ख़ुशी ” कुठे ” गम ” !!
मुंबईः राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे राज्य नव्याने अनलॉक होत असून आज रात्रीपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचा स्तर म्हणजेच गट ठरल्यानंतर उद्या सोमवारी कुठे काय सुरु आणि काय बंद राहील ? याचे उत्तर मिळणार आहे. याबाबतच्या नव्या आदेशाची अंमलबजावणी होईल. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता या आधारावरच हे निर्बंध शिथील करण्यात येणार असून त्यासाठी एकूण पाच गट निश्चित करण्यात आले आहेत.
दरम्यानच्या काळात मे महिन्याच्या अखेरीस अनेक जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाला काही प्रमाणात आळा घालण्यात यश येत असल्यामुळेच काही निर्बंधात आणखी शिथिलता आणण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबतची नवीन नियमावली शुक्रवारी मध्यरात्री मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जाहीर केली.
नव्या नियमावलीनुसार मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. याचा अर्थ, तेथील महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाच गटांत वर्गीकरण
पहिला गट –
पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन खाटा २५ टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी भरलेल्या.
या गटात सर्व व्यवहार खुले करण्यात येतील.
मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल
दुसरा गट
पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि ऑक्सिजन खाटा २५ टक्के ते ४० टक्के भरलेल्या असे जिल्हे.
मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट
तिसरा गट
पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के ते १० टक्के आणि ऑक्सिजन खाटा ४० टक्क्यांहून अधिक भरलेल्या.
दुकाने दु. ४ पर्यंत सुरू राहतील.
सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील.
चौथा गट
पॉझिटिव्हिटी दर १० ते २० टक्के आणि ऑक्सिजन खाटा ६० टक्के भरलेले जिल्हे.
सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दु. ४ पर्यंत सुरू राहतील.
अन्य दुकाने बंद राहतील.
पाचवा गट
पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांहून अधिक आणि ७५ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड भरलेले जिल्हे
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दु. ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार, रविवारी ती बंद असतील.
लग्नसोहळ्याचे निर्बंध शिथील
वर्गीकरणानुसार पहिल्या गटात लग्न सोहळ्यास कोणतेही बंधने नसतील. दुसऱ्या गटात हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. तिसऱ्या गटात ५०, तर चौथ्या गटात केवळ २५ जणांना उपस्थितीची मर्यादा.
अंत्यविधीसाठी नियम
अंत्यविधीसाठी पहिल्या दोन गटांत कोणतीही बंधने नाहीत. तिसऱ्या, चौथ्या गटात उपस्थितीला २० जणांची मर्यादा. पाचव्या टप्प्यात सर्व निर्बंध कायम असतील.