IndiaNewsUpdate : चिंताजनक : देशात रोज होताहेत तीन हजाराहून अधिक मृत्यू !!
नवी दिल्ली । भारतात कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून मागील 14 दिवसांमध्ये देशात मृतांची संख्या 185 टक्क्यांनी वाढली आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या कोविड ट्रॅकरनुसार, देशात सध्या दररोज साधारणतः 3417 जणांचा मृत्यू होत आहे. चार आठवड्यांआधी हा आकडा 787 च्या जवळपास होता.
भारतातील दुसऱ्या कोरोना लाटेसंदर्भात शास्त्रज्ञांनी लावलेली अंदाजही अचूक नसल्याचे समोर येत आहे. एप्रिलच्या मध्यात लान्सेट पत्रिकामध्ये प्रकाशित झालेल्या स्टडीमध्ये अशा दावा केला गेला होता, की जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतात दररोज अडीच हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू होईल. मात्र, 27 एप्रिललाच भारतातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दैनंदिन आकडा तीन हजाराच्या पार गेला होता. न्यूयॉर्क टाइम्सच्या कोविड ट्रॅकरनुसार, भारतात मागील 14 दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत 82 टक्के वाढ झाली आहे. चार आठवड्यापूर्वी भारतात दररोज सरासरी 1,43,343 नवे रुग्ण आढळत होते. मात्र, आता दररोज साडेतीन लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत.
सध्या देशात जितक्या लोकांची कोरोना चाचणी होत आहे, त्यातील 21.2 टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट 15 फेब्रुवारीनंतर सुरू झाली. तोपर्यंत हा दर केवळ 1.60 टक्के इतका होता. परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज यावरुन लावता येऊ शकतो, की जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, हा दर कमाल 10 टक्क्यांपर्यंतच पाहिजे.
देशात सोमवारी कोरोनाचे नवे 3,55,828 रुग्ण आढळले आहेत. तर, 3438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, एकूण बाधितांची संख्या 2 कोटी 2 लाख 75 हजार 543 वर पोहोचली आहे. तर, मृतांची संख्या 2 लाख 22 हजार 666 झाली आहे. देशात एक मे रोजी कोरोनाचे सर्वाधिक 4,01,993 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, दोन मे रोजी 3,92,488 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 34,44,548 वर पोहोचली आहे.