CoronaMaharashtraUpdate : राज्यात २६० पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू , सर्वांना नियम पाळण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन
राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ८० हजार ३०७ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४० हजार ८०८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ३० कोटी ७७ लाख ७४ हजार ९८२ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १० ऑक्टोबर या कालावधीत, पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३७२ घटना घडल्या असून ८९८ व्यक्तीना ताब्यात घेण्यात आले आहे. या काळात १०० नंबरवर आलेल्या फोनची संख्या १ लाख १३ हजार ९१८ इतकी असून अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर जप्त केलेलय वाहनांची संख्या ९६,५६८ इतकी आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील २३५ पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २६० पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.