#CoronaVirusUpdate : राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण साडेतीन हजाराच्यावर तर मृत्यूची संख्या २११
राज्यातील कोरोनग्रस्तांची आकडेवारी…
अकोला महापालिका – १ , अमरावती पालिका – १, औरंगाबाद पालिका – १, कल्याण – डोंबिवली – ५, मिरा – भाईंदर – ११, मुंबई महापालिका – १८४, नागपूर महापालिका – ३, नंदुरबार – १, नवी मुंबई महापालिका – २, पालघर – ७, पनवेल पालिका – १, पिंपरी-चिंचवड – ८, पुणे महापालिका – ७८, पुणे जिल्हा – १, रायगड – ५, सातारा – ४, सोलापूर महापालिका – २, ठाणे – ३, ठाणे महापालिका – ६, वसई-विरार महापालिका – १, भिवंडी – ३, एकूण – ३२८ करोनाबाधित
राज्यात शनिवारी ३२८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, करोनाबाधित रुग्णसंख्या दिवसभरात वाढली असली तरी आज आणखी ३४ करोनाबाधित रुग्ण हे उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. दरम्यान गेल्या २४ तासात ११ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील पाच, पुण्यातील चार आणि ठाणे व औरंगाबाद महापालिका हद्दीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यात एकूण करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या २११ झाली असून राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण ३ हजार ६४८ इतकी झाली आहे. आजतागायत एकूण ३६५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील करोनाबाधित रुग्णसंख्या एकूण २ हजार २६८ असून, त्यात १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२८ असून, तेथील मृत्यूंची संख्या ४९ आहे . नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ४५ असून तेथे दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज शनिवारी ११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात सहा पुरुष आणि पाच महिला आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी पाच रुग्ण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत. तर सहा रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील आहेत. ११ पैकी ९ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. करोनामुळे राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या २११ झाली आहे. तथापि, यापूर्वी ११ एप्रिल रोजी कळविलेला एक मृत्यू करोना निगेटिव्ह असल्याचे मुंबई महापालिकेने कळविल्यामुळे सदर मृत्यू एकूण मृत्यूमधून वगळण्यात आल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान काल पर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ हजार ४६८ नमुन्यांपैकी ६३ हजार ४७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले असून, ३ हजार ६४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ३४४ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून, एकूण ५ हजार ९९४ सर्वेक्षण पथकांनी आजतागायत २३ लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ८२ हजार २९९ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, ६ हजार ९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, असे टोपे यांनी सांगितले.