#CoronaVirus #AurangabadUpdate : पुढील ७ दिवस नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन , रेल्वे, विमानतळ आणि बसस्थानकावर शुकशुकाट
औरंगाबाद शहरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून औरंगाबाद जिल्हा प्रशासन , आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. पुढील सात दिवस धोक्याचे असून नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा अनावश्यक गर्दी आणि प्रवास टाळावा असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे आणि महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले आहे.
दरम्यान औरंगाबाद शहरात एका महिलेला कोरुना व्हायरस झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने शहरातील मॉल, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या शिवाय नागरिकांमध्ये जागृती होण्याच्यादृष्टीने सेवाभावी संस्थांची मदत घेतली जात आहे . औरंगाबाद शहरात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी ५० गनची मागणी करण्यात आली आहे. व्यापारी महासंघ आणि इतर सेवाभावी संघटनांनी व्हायरसपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ज्या भागात कोरोनाग्रस्त महिला आढळून आली त्या भागातील पंधराशे घरांची तपासणी महानगरपालिकेने केली आहे. दरम्यान या महिलेच्या संपर्कात आलेल्या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहितीही महापौरांनी दिली. पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले कि , पुढील ७ दिवस महत्त्वाचे असून आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा अनावश्यक प्रवास करू नये. महापालिकेच्या वतीने विशेष पथक तयार करण्यात आले असून पुण्याहून खाजगी वाहने शहरात येणाऱ्या नागरिकांची तपासणी नाक्यावर केली जाणार आहे . तपासणीसाठी महापालिकेने १२ पथके तयार केली आहे तयार केली आहेत.
रेल्वे, विमानतळ आणि बसस्थानकावर शुकशुकाट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बस, रेल्वे आणि विमान प्रवाशांकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे या सर्व ठिकाणी शुकशुकाट पहावयास मिळत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बस गाड्या रेल्वे आणि विमानसेवाही रद्द कराव्या लागत आहेत. औरंगाबादचे आगारप्रमुख शिंदे यांनी सांगितले की, प्रवासी सध्या प्रवास करणे टाळत आहेत. पुण्याला जाण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता शिवनेरी बस प्लॅटफॉर्मवर लावण्यात आली होती, मात्र पाच तास उभी केल्यानंतर अवघ्या १८ प्रवासी घेऊन ही बस पुण्याला रवाना झाली. त्यानंतर सकाळी सहा वाजता पुणे प्लॅटफॉर्मवर शिवशाही बस लावण्यात आली . २९ प्रवासी झाल्यानंतर बस पुणे मार्गाने निघाली. एसटी प्रमाणेच रेल्वे प्रवासावर ही कोरोनाचा परिणाम झाला आहे. दरम्यान विमान प्रवास करणेही प्रवाशांनी सोडले असून त्यामुळे स्पाइस जेट कंपनीला मंगळवारची विमानसेवा रद्द करावी लागली. त्याच बरोबर औरंगाबाद-हैदराबाद , हैदराबाद-औरंगाबाद , अहमदाबाद- औरंगाबाद, औरंगाबाद -हमदाबाद , औरंगाबाद -दिल्ली आणि दिल्ली-औरंगाबाद ही विमानसेवाही कंपनीने रद्द केली होती. ऑपरेशनल कारणामुळे या सेवा रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.