ताजी बातमी | बातम्या बदलल्या : काॅंग्रेसचा घोळात घोळ, शिवसेनेला अद्याप पाठिंब्याचे अधिकृत पत्र दिले नाही, काॅंग्रेसचा खुलासा, राष्ट्रपती राजवटीची शक्यता
महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी टोकाचे वैचारिक मतभेद दूर सारून शिवसेनेला महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय
घेतल्याचे सांगितले जात होते परंतु अद्याप तसं पत्र दिलेच नसल्याचं काॅंग्रेसने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करुनच त्यासंबंधी निर्णय घेतला जाणार असल्याचे काॅंग्रेसने कळविले आहे.
दरम्यान शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे करुन त्यासाठी वेळ मागितला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
आज दिवसभर या विषयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना व याबाबत अनेक उलटसुलट बातम्या क्षणाक्षणाला येत असताना त्याचं उत्तर ‘होय’ असं मिळालं असलं तरी अद्याप काॅंग्रेसने अधिकृत काहीही कळविले नाही.
सोनिया गांधी यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला तत्वत: पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असला तरी, हा पाठिंबा आतून कि बाहेरुन यांचा निर्णय झालेला नाही.
शिवसेनेकडून मात्र सरकार स्थापन करण्याच्या हालचाली चालू झाल्या असून मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे.
काॅंग्रेसचे पत्र हि केवळ औपचारिकता राहीली असली तरी काॅंग्रेसचा घोळ कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच जवळपास सुटल्यात जमा असला तरी सत्तावटपाचे नाट्य रंगणार असे दिसत आहे.
दरम्यान आज सकाळपासून मुंबई, जयपूर आणि दिल्लीत वेगवान घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी दोनवेळा चर्चा केली. त्यादरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांची वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठकही झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी समान किमान कार्यक्रमावर शिवसेनेला पाठिंबा देणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र काँग्रेसकडून कोणताच निर्णय येत नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, जयपूरमध्ये असलेल्या आमदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा आणि उद्धव ठाकरे यांनी फोनवरून केलेली चर्चा यामुळे कोंडी फुटली आणि सोनिया गांधी शिवसेनेच्या सरकारला तत्वत: पाठिंबा देण्यास तयार असल्याचे संकेत मिळाल्याने शिवसेनेने उत्साहात राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचे पत्र देऊन बहुमताची यादी देण्यास ४८ तासांचा अवधी मागितला परंतु राज्यपालांनी नकार दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सर्व चित्र बदलले आहे.
दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून आमदारांच्या समर्थनाचं पत्रही शिवसेनेला पाठवण्यात आलं आहे. हे पत्र फॅक्सद्वारे पाठवण्यात आलं असून ते घेऊन शिवसेनेचे नेते सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.