Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : जगमित्र साखर कारखानाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून धनंजय मुंडे यांना मिळाला दिलासा

Spread the love

राष्ट्रवादीचे नेते आणि परळीतील  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कालपासून धनंजय मुंडे  कौटुंबिक समस्यांनी त्रस्त असताना  त्यांना दिलासा  देणारे  वृत्त आहे. बेलखंडी मठ जमीन गैरव्यवहार म्हणजेच जगमित्र साखर   कारखाना घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने २ आठवड्यांचा दिलासा दिला आहे.   पुढील सुनावणी २ आठवड्यांनी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर धनंजय मुंडेंच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे. एका वृत्त वाहिनीने हे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली होती. शिवाय, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी २१ ऑक्टोबर म्हणजे आज मतदानाच्या दिवशी ठेवली होती. मात्र आता ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या तिकीटावर धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात बहीण आणि भाजपच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय भवितव्य मतपेटीत बंदिस्त होत असतानाच जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन घोटाळा झाल्याच्या आरोपातही त्यांचा निकाल येण्याची चिन्हं होती.

जगमित्र साखर कारखाना प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी  २००६ ते २०१० या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल २५ कोटी रुपयांचं भागभांडवलही उभं केलं. मात्र कारखाना काही सुरु झाला नाही.

या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची २५ एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली. जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले. पुढे जगमित्र साखर कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली आणि हा कारखाना सुरु होण्याआधीच बंद पडला. पण त्यानंतरही कारखान्याने जमीन परत केली नाही.

रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचं सांगत त्यांनी उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. फड यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे यांच्यासह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश शासनाला देण्याची विनंती केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!