Jammu & Kashmir : ३७० कलम असंवैधानिकपणे रद्द केल्याच्या निषेधार्थ डाव्या पक्षांची निदर्शने
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० घटनेतून असंविधानिक पद्धतीने वगळल्याच्या निषेधार्थ आज मुंबईत डाव्या पक्षांनी आझाद मैदानात निदर्शने केली. या वेळी विविध पुरोगामी संघटनांसह विविध सामाजिक स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.
देशातील वैविध्य आणि संघराज्याचे तत्त्व भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही. संविधान पायदळी तुडवत त्यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्राच्या सत्तेखालील केंद्रशासित प्रदेश बनवत आहेत. राष्ट्रीय एकात्मता आणि संघराज्य रचना या भारताच्या संकल्पनेवरील हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला असल्याची टीका डाव्यांनी केली.
सर्व संबंधित घटकांशी राजकीय संवादातूनच जम्मू आणि काश्मीरच्या जनतेचे शेष भारतातील जनतेशी संबंध दृढ होऊ शकतात. खुद्द भारत सरकारने तीन वर्षांपूर्वी असा संवाद सुरू करण्याचे वचन दिले होते. त्या ऐवजी या एकतर्फी पावलामुळे तेथील जनतेतील फुटीरतेची भावना अधिकच बळकट होईल आणि ही बाब भारताची एकता आणि एकात्मता यांना अतिशय हानीकारक असल्याचे मत यावेळी विविध वक्त्यांनी व्यक्त केले. काश्मीरमध्ये सध्या दूरध्वनी, इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबियांशी संवाद साधता येत नसून त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचे काश्मिरी विद्यार्थ्यांनी म्हटले.