राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या मंत्रिपदावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले , मुख्यमंत्री म्हणाले योग्य प्रक्रियेप्रमाणेच निवड
आज पासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विधानसभा सभागृहात कामकाजाला सुरुवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राधाकृष्ण विखे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबद्दल आक्षेप नोंदवत राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना मंत्रिपद कसे काय दिले जाऊ शकते? एखाद्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यावर मंत्रीपद देणे योग्य आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड योग्य त्या प्रक्रियेप्रमाणेच झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरादाखल स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर रविवारी सायंकाळी खातेवाटप जाहीर झाले. नवे मंत्री विधान भवनात येऊ लागल्यावर विरोधकांनी पायऱ्यांवर बसून, हाती फलक घेत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. राधाकृष्ण विखे पाटील विधान भवनात येताच आयाराम, गयाराम, जय श्रीराम अशा घोषणांनी भवन परिसर दणाणून सोडला. ‘विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दंग’, आले रे आले चोरटे आले, अशा प्रकारच्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात येताच देण्यात आल्या. विरोधक आणि मुख्यमंत्री असा सामना पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाला. गेली चार वर्षे विधानसभा सभागृहातील विरोधीपक्षनेतेपदी विराजमान असलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने ते पावसाळी अधिवेशनात सरकारी बाकांवर बसलेले दिसले.