शहीद पोलिसांच्या शौर्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सलाम
नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंगातील स्फोटात काल शीघ्र कृती दलाचे १५ पोलीस ठार झाले होते. या शहीद पोलिसांच्या शौर्याला सलाम करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे देखील उपस्थित होते.
शहीद पोलिसांचे पार्थिव गडचिरोलीतील पोलीस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शहीदांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैयस्वाल यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर शहीद जवानांचे पार्थिव पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. येथे त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देत श्रद्धांजली वाहण्यात आली.