शास्त्री भवन आग : मोदीजी, आग लावून फाइली जाळल्या तरी तुम्ही वाचणार नाहीत. तुमच्या निकालाचा दिवसही जवळ आलाय : राहुल गांधी
Modi ji burning files is not going to save you. Your day of judgement is coming. https://t.co/eqFvTJfDgY
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 30, 2019
शास्त्री भवनमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालय, विधी मंत्रालय, महिला व बालकल्याण मंत्रालयासहीत सांस्कृतिक मंत्रालयाची कार्यालये आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी या आगीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. मोदींच्या सांगण्यावरूनच आग लावण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
‘मोदीजी, आग लावून फाइली जाळल्या तरी तुम्ही वाचणार नाहीत. तुमच्या निकालाचा दिवसही जवळ आलाय,’ असं ट्विट राहुल यांनी केलं आहे.
आज दुपारी तीनच्या सुमारास शास्त्री भवनला आग लागली. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक कार्यालयात लाकडी फर्निचर असल्याने आगीने लवकर पेट घेतला. अचानक आग भडकल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
केंद्र सरकारची अनेक महत्त्वपूर्ण कार्यालये असलेल्या शास्त्री भवनमधील आगीवर तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या कार्यालयांना या आगीची झळ पोहोचली असून आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, मोदींच्या सांगण्यावरूनच ही आग लावल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.