एल्गार परिषद : भीमा कोरेगावप्रकरणी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी सुधा भारद्वाज, वरवरा राव, वर्नन गोन्साल्विस आणि नक्षलवाद्यांचा नेता मुपाल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. १, ८३७ पानांचे हे आरोपपत्र आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट २०१८ रोजी तेलगु कवी वरवरा राव यांना हैदराबादेतून, व्हनरेन गोन्सालविस व अरूण फरेरा यांना मुंबईतून कामगार संघटना नेत्या सुधा भारद्वाज यांना फरिदाबादेतून तर नागरी कार्यकर्ते गौतम नवलाखा यांना दिल्लीतून अटक केली होती. या हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. १, ८३७ पानांचे हे आरोपपत्र आहे. एल्गार परिषदेत सुधीर ढवळे आणि कबीर कला मंचच्या इतर सदस्यांनी तेढ निर्माण करणारे, चिथावणीखोर वक्तव्य करुन पत्रके, पुस्तिका आणि भाषणे याच्या माध्यमातून समाजात शत्रुत्व निर्माण केल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. दलित समाजाची दिशाभूल करुन त्यांच्या मनात जहाल माओवादी विचारांचा प्रचार करणे, हे माओवादी संघटनेचे धोरण आहे, असे यात म्हटले आहे.