VinayakMeteNewsUpdate : मेटेंच्या पत्नीबरोबर भाच्यानेही चालकाच्या वर्तनाविषयी व्यक्त केली गंभीर शंका …
मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे निधन अपघात आहे कि घातपात याची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. हि चौकशी सुरु असताना आता त्यांच्या पत्नीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असतानाच त्यांच्या भाच्यानेही अपघाग्रस्त गाडीमध्ये विनायक मेटे नव्हतेच असा दावा केला आहे. या दाव्यामुळे पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विनायक मेटे यांचे बचे बाळासाहेब चव्हाण म्हणाले कि , “विनायक मेटे यांनी जागीच प्राण सोडला आहे. हे समजल्यानंतर मी ड्रायव्हर एकनाथ कदमला फोन केला होता. तेंव्हा त्याने सांगितले की, “साहेब बरे आहेत, साहेबांना काही झाले नाही, मी २० मिनिटे साहेबांसोबत बोलतोय, ते व्यवस्थित आहेत, अशी माहिती ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी दिली. मात्र, मी विनायक मेटे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे ड्रायव्हर एकनाथ कदमने दिलेल्या त्या माहितीचा नेमका काय अर्थ घ्यायचा?” असा प्रश्न चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेमधून उपस्थित केला आहे.
अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं ?
दरम्यान अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं याबद्दलही बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषदे माहिती दिली. मागील १२ वर्षांपासून हा चालक त्यांच्यासोबत काम करत होता. १३ ऑगस्ट रोजी वाहनाच्या अती वेगासाठी चलान झालं होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे मला शिवसंग्रामचे पदाधिकारी तुषार काकडेंचा फोन आला. साडेपाचच्या सुमारास आलेल्या या फोन कॉलवर त्यांनी मला मेटेंच्या गाडीचा अपघात झाल्याचं सांगितलं आणि आपल्याला तातडीने निघावं लागेल असंही ते म्हणाले. त्यानंतर मी मेटेंचे खासगी सचिव विनोद काकडेंना फोन करुन वाहन चालक कोण होता वगैरे यांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला,” असं चव्हाण म्हणाले.
चालकाची उत्तरे देण्यास टाळाटाळ
“मेटेंसोबत एकनाथ कदम असल्याचं समजल्यानंतर मी त्याला फोन करुन विचारणा केली असता , त्याने सुरुवातीला मला ओळखलं नाही. त्याला मी अपघाताचे नेमके ठिकाण कोणते आहे हे समजण्यासाठी मोबाईलवरुन पाठवण्यास सांगितलं असता त्याने ते ही पाठवलं नाही. तो सारखा रडत होता. मात्र मी लोकेशन विचारलं असता तो उत्तरास टाळाटाळ करत होता. मी दुसऱ्या क्रमांकावरुन फोन केला असता त्याने मला आवाजावरुन ओळखलं,” असंही बाळासाहेब चव्हाण म्हणाले.
“मी त्याच्याकडे मदतीसंदर्भात विचारणा केली. तसेच मेटे यांची प्रकृती कशी आहे याची विचारणा केली असता त्याने, साहेबांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आल्याचं सांगितलं. तसेच त्यांच्या केवळ डोक्याला व पायाला मार लागल्याचेही त्याने सांगितलं. अपघातानंतर जवळ जवळ २० मिनिटं मी त्याच्याशी बोलत होतो, असंही तो मला म्हणाला. अखेर त्याने दुसऱ्या व्यक्तीकडे फोन दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने मला नेमका अपघात कुठे झाला याची माहिती दिली,” असं बाळासाहेब चव्हाण म्हणाले. त्याचप्रमाणे, “दुसऱ्या व्यक्तीने मेटे यांचा जागीच मृत्यू झाल्याचेही सांगितले. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत असणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत असल्याचीही माहिती त्या व्यक्तीने दिली. तसेच चालकाला इजा झाली नसल्याचंही ते म्हणाले,” असंही चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
“टोलनाक्यापासून २० ते २५ मिनिटांच्या अंतरावर मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. महामार्गावरील सीटीटीव्ही फुटेजमध्ये ते गाडीत असल्याचे दिसत नव्हते. गाडीमध्ये पुढील बाजूला मेटे यांचा सुरक्षारक्षक दिसत असून ड्रायव्हर मोबाईलवर कोणाशी तरी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यामुळे हा अपघात घडला की घडवून आणला याची चौकशी झाली पाहिजे. चालक एकनाथ कदम हा सातत्याने त्याचे जबाब बदलत असून यासंदर्भात सखोल चौकशी करणे आवश्यक आहे,” असं बाळासाहेब चव्हाण यांनी म्हटलं आहे. एकनाथ कदम सातत्याने जबाब बदलत असल्याने कुटुंबियांच्या मनात हा अपघात आहे की घातपात याबद्दल संशय असल्याचं सांगत चव्हाण यांनी या प्रकरणाची सरकारने सखोल चौकशी करावी अशी मागणी केल आहे.
सखोल चौकशीची मागणी
मराठा आरक्षणासाठी १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. मात्र, यावरून आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आम्ही माहिती घेतली त्यानुसार अपघात झाला तेव्हा २ तास तिथे रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही सुविधा मिळाली नाही. आजूबाजूला मदतीसाठी कुणी थांबलं नाही. येण्या-जाण्यातही बराच वेळ गेला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चालकाची पोलिसांकडून चौकशी…
दुसरीकडे मेटे यांच्या पत्नी ज्योती यांनीही चालकासंदर्भात बोलताना केलेलं विधानही प्रकरणाचं गूढ वाढवणारं आहे. विनायक मेटेंचा अपघात हा घातपात तर नाही ? या दृष्टीकोनाने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मेटे यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण खोपोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतं. गाडी चालवत असलेला आणि सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत असणारा मेटे यांचा चालक एकनाथ कदम यांची चौकशी आज खोपोली पोलिसांनी सुरु केली आहे. पोलिसांनी रुग्णालयामध्ये जाऊन एकनाथ कदमचा जबाब आज नोंदवला.
डॉ. ज्योती मेटे यांनीही व्यक्त केला संशय …
दरम्यान मेटे यांच्या पत्नी ज्योती यांनी चालक अपघाताचं ठिकाण सांगत नव्हता असं म्हटलं आहे. सत्य लपवण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. “अपघात झाल्याचं समजल्यानंतर तो नेमका कुठे झालेला आहे त्याचं ठिकाण मला कोणीही सांगत नव्हतं. ड्रायव्हरशी बोलण्याचा प्रयत्न केला. तो ते ठिकाण सांगू शकत नव्हता,” असं ज्योती यांनी म्हटलं आहे. “तो ड्रायव्हर गेली काही वर्षं साहेबांकडे काम करत आहे. तो या मार्गावर सातत्याने साहेबांबरोबर प्रवास करतो,” असंही त्या चालकासंदर्भात माहिती देताना म्हणाल्या.
“मी (रुग्णालयात) पोहोचल्यानंतर मला जी अपघाताची वेळ कळली होती त्या वेळेपेक्षा अगोदर साहेबांचा मृत्यू झालेला आहे हे मला लक्षात येत होतं. त्यामुळे कुठेतरी एक कडी मिसींग आहे. माझ्यापासून सत्य दडवलं जात आहे एवढं मला वाटतं होतं,” असंही ज्योती यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.