MaharashtraPoliticalCrisis : राज्यातील सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात , उद्या सुनावणी …
मुंबई : ठरल्याप्रमाणे राज्याच्या राजकारणाचा गुंता आता सर्वोच्च न्यायालयात गेला असून शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर उद्या सकाळी साडेदहा वाजता सुनावणी सुरु होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या वतीने अॅड. हरिष साळवे यांच्यासह अनेक तज्ज्ञ वकील बाजू मांडणार असून शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल उभे राहणार आहेत.
आज कोर्टात काय होणार ?
गुवाहाटीला गेल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्या गटाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना ३४ लोकांच्या सह्यांचे पत्र देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कारवाईला आक्षेप घेत नवा गटनेता निवडण्यास विरोध दर्शवला होता हे पत्र झिरवळ यांनी निकालात काढत ठाकरे यांच्या पत्रानुसार दोन्हीही नेत्यांच्या नावातील बदल मंजूर केला तसेच राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी कायदेशीर चर्चा करुन शिवसेनेच्या १२+४ बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत त्यांना दोन दिवसात म्हणणे मांडण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली आहे.
दरम्यान या नोटीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे शिंदे गटाला जाऊन मिळालेल्या १६ आमदारांना उद्या चार वाजेपर्यंत विधान भवनात दाखल होणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. हि कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटाने या कारवाई विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचा गटनेता बदलण्यात आला आहे. त्याला नरहरी झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे अजय चौधरी हे शिवसेनेचे नवे गटनेता आहेत. या निर्णयाविरोधातही बंडखोरांनी कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांचे ट्विटरवरून उत्तर ..
दरम्यान आता शिवसेनेचे आक्रमक धोरण लक्षात घेऊन त्यांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी केली असल्याचे त्यांच्या ट्विटवरून दिसत आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि ,
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर….तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…
तर लागोपाठ दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि ,
मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..
मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?
यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..#MiShivsainik @rautsanjay61— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022