MaharashtraNewsUpdate : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा नाही , २०५३ कर्मचाऱ्यांचे निलंबन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. दरम्यान एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून संप मागे घेण्याच्या तयारीत नसल्याने राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत असतानाही संप सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान आतापर्यंत एसटीच्या संपात सहभागी हलेल्या २०५३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून पुण्यातील आकडा सर्वाधिक आहे.
राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र कायद्याने हे शक्य नसल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांकडे काही अवधीही मागितला आहे. मात्र एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यातही संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांवर कडक कारवाईची एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे. निलंबनानंतर आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय करून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी गमावण्याची टांगती तलवार असल्याने तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान पुण्यातून १३८ कर्मचाऱ्यांचा निलंबन करण्यात आलं असून त्यानंतर ठाण्यातून ७३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला
मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. सर्व कर्मचारी आपलेच असून कोरोना काळातून राज्य सावरत असताना सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभिर्यानं विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केले असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांचा विरोधकांवर निशाणा
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी असून त्यांचा पगार वाढवण्याची गरज आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मधला मार्ग काढण्याची गरज आहे, असं सांगतानाच विरोधक एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देत आहेत. संप चिघळवण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले.
नागपुरात विजय वडेट्टीवार यांनी प्रसार मध्यमसनही संवाद साधताना हे आवाहन केले . एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. पगार वाढवण्याची आवश्यकता आहे. न्यायालयाच्या माध्यमातून संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटायला हवा. प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी मधला मार्ग काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले .