पुन्हा आरोग्य विभागाच्या परीक्षेत घोळ
मुंबई, पुणे आणि नाशिक येथील केंद्रावर आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा घोळ झाल्याचे पाहायला मिळाळे आहे. त्यामुळे या अडचणींचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिक अडचणीमुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच या गोंधळामध्ये जेवढा वेळ विलंब झाला तेवढा वेळ विद्यार्थांना वाढवून मिळेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
पेपर मिळण्यात विलंब आणि आसनव्यवस्थेतील घोळावरुन पुण्यातील एका केंद्रावरही गोंधळ झाला. तर नाशिकमधील काही केंद्रांवर पेपर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गिरणारेच्या केबीएच महाविद्यालयातील केंद्रावरही गोंधळ पाहायला मिळाला. विदयार्थी जास्त आणि पेपर कमी आल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय. 11 वाजून गेल्यानंतरही पेपर सुरू झाला नव्हता. यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. आरोग्य भरतीच्या पेपरमधल्या आयोजनात पुन्हा मोठा गोंधळ दिसत आहे. या परीक्षामध्ये दोन सत्रात पेपर असल्याने उमेदवारांना सकाळी एका जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही विद्यार्थ्यांना याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
या आधी देखील आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य सेवा परीक्षेवेळीही मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. काही उमेदवरांना चुकीचे हॉल तिकीट मिळाले होते. परीक्षा केंद्राची कमतरता. उत्तरप्रदेशपासून चीनच्या वूहाण प्रांतातील पिनकोड प्रवेशपत्रावर देण्यात आला होता. राज्यातील आठ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणारी ही लेखी परीक्षा असल्याने गोंधळामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना स्वतः माध्यमांपुढे येत हि परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. त्यांनी त्यावेळी सारवासारव केली खरी; मात्र अजूनही हा प्रश्न सुटल्याचे दिसून येत नाहीये. त्यामुळे याबाबत आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.