AurangabadUnlockUpdate : औरंगाबादकरांसाठी झाले ” मोकळे आकाश” तर जिल्ह्यासाठी अंशतः निर्बंध कायम !!
औरंगाबाद शहर पहिल्या टप्प्यात तर जिल्हा तिसऱ्या टप्प्यात
औरंगाबाद : राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील कोविड-19 विषयक बाधित परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी 2.24 टक्के (Positivity) असून व्यापलेल्या ऑक्सीजन बेडची टक्केवारी 22.19 टक्के असल्याने औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्राचे शासन वर्गवारी नुसार स्थान सध्या Level-1 (पातळी 1)मध्ये असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. निखिल गुप्ता यांनी जाहीर केले आहे.
या आदेशानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्राकरिता ७ जुन रोजीचे सकाळी ७ वाजेपासून पुढील आदेशापर्यंत सध्या लागू असलेले निर्बंध शिथिल करुन सुधारित आदेश लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. दरम्यान औरंगाबाद शहर जरी पहिल्या टप्प्यात आले असले तरी औरंगाबाद जिल्हा , ग्रामीण क्षेत्र मात्र तिसऱ्या टप्प्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि . प . चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिले आहेत.
औरंगाबाद शहरात आदेशात नमूद केल्याप्रमाणे सर्व व्यवहार पुढील आदेशापर्यंत पूर्ववत सुरु राहतील तर ग्रामीण भागात आदेशात नमूद केल्याप्रमाणे सर्व व्यवहार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील तर सर्व सेवा ५० टक्के मर्यादेप्रमाणे सुरु राहतील. याशिवाय ग्रामीण भागात ५ वाजेपर्यंत जमावबंदीचे तर ५ नंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांसाठी संचारबंदीचे आदेश लागू राहणार आहेत.
औरंगाबादचे दोन गटात विभाजन
राज्य शासनाच्या आदेशानुसार पहिला गट – पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन खाटा २५ टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी भरलेल्या यावर ठरविण्यात आला असून या गटात सर्व व्यवहार खुले करण्यात येतील तसेच मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांनाही वेळेचे बंधन नसेल तर तिसरा गट पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के ते १० टक्के आणि ऑक्सिजन खाटा ४० टक्क्यांहून अधिक भरलेल्या यावर ठरविण्यात आला असून या गटातील सर्व दुकाने व आदेशात निर्गमित सेवा दु. ४ पर्यंत सुरू राहतील.तर ग्रामीण भागातील मॉल, सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील.
पहिल्या गटात सर्व काही सुरु पण एसओपी बंधनकारक
दरम्यान हे आदेश लागू करताना अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकाने भारत सरकारच्या कोव्हीड संदर्भाने आवश्यक सूचना उदा. मास्क चा वापर, दो गज दुरी (सहा फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा उपकरणांचा जसे की, फेसशिल्ड चा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा उपलबध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व एस.ओ.पी. चा वापर करणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक राहील.
लक्षात घ्यावे असे काही…
१. सर्व उदयोग, व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचा-यांना निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहिल. (वैधता १५ दिवसांकरिता) निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवालाशिवाय दुकान/व्यवसाय सुरु करता येणार नाही.
२. या नियमांचे उल्लंघन केल्यास कोराना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तीत्वात आहे तो पर्यंत संबंधित दुकान/आस्थापना बंद ठेवण्यात येईल, तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाप्रमाणे दंड आकारण्यात येईल.
३ उक्त निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात (नागरी भागात) आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका औरंगाबाद यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी/तहसिलदार, औरंगाबाद यांची राहिल.
४. . सदरचे आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील
सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहिल असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.