#CoronaVirusEffect : चौथ्या लॉकडाऊन मध्ये विवाह आणि अंत्यसंस्कारावर आहे इतक्या लोकांचे बंधन
केंद्र सरकारने कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन पुन्हा एकदा ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये गृहमंत्रालयाने नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणाला परवानगी दिलेली नाही. तसंच हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाईल. मेट्रो सेवा बंदच राहणार असून शाळा, कॉलेज, मॉल, चित्रपटगृहांनाही परवानगी नाही.
लॉकडाऊन ४ मध्ये गृह मंत्रालयाने लग्न समारंभ तसेच अंत्यसंस्कारासाठी काही आदेश दिले आहेत. यानुसार लग्न सोहळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. तसंच लग्न सोहळ्यासाठी ५० पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. अंत्यसंस्कारावेळीही गर्दी होऊ नये यासाठी गृहमंत्रालयाने नियमावली जारी केली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिमगचं पालन करून जास्ती जास्त २० लोक उपस्थित राहू शकतात. बाहेर पडण्याआधी मास्क लावणे बंधनकारक आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार लॉकडाऊनच्या काळात ६५ वर्षांवरील व्यक्ती, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांनी घरातच रहावं असं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या काळात एअर अॅम्ब्युलन्स वगळता इतर सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, जिम ३१ मे पर्यंत बंद राहणार आहेत. याशिवाय सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमही करता येणार नाहीत. प्रार्थना स्थळ, धार्मिक स्थळे ३१ मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.