थरारक : मुंबईहून साताऱ्यात आलेल्या कुटुंबियांच्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू , सहा दिवस मृतदेह घरातच ठेवला ….
देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउन करण्यात आले असले तरी मुंबईतील अनेक जण आपापल्या गावी पोहोचत आहेत . याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील जावली गावात आलेल्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्या मुलाचा मृतदेह कुटुंबीयांनी तब्बल सहा दिवस घरातच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील म्हाते खृर्द गावातील एक कुटुंब हे अनेक वर्षांपासून कामानिमित्त मुंबईमध्ये राहत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 27 मार्चला हे कुटुंब आपल्या 15 वर्षीय मुलासह मुंबईवरून आपल्या गावी आले होते. त्यांचा पंधरा वर्षीय मुलगा हा गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आजारी होता. मुंबईवरून येवून दीड महिना उलटल्यानंतर पंधरा वर्षीय मुलाचा घरातच मृत्यू झाला.
दरम्यान या मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबीयांनी याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला दिली नव्हती. घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या घरात जावून पाहिले असता १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं. या घटनेची माहिती नागरिकांनी मेढा पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्थवचा मृतदेह ताब्यात घेतला असून हॉस्पिटलमध्ये शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यू कशाने झाला आहे, याचा उलगडा होणार आहे. मात्र, मृत्यू होवून सहा दिवस मृतदेह घरात ठेवल्याने मुलाच्या मृत्यूबद्दल सस्पेन्स निर्माण झाला असून हा मृत्यू नैसर्गिक, आत्महत्या, खून की कोरोनामुळे हे मात्र उद्या सकाळीच स्पष्ट होणार आहे.