आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी शक्तींनी एकत्र यावे : बाळासाहेब थोरात
राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून, या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी शक्तींनी एकत्र यावं, असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं. सध्या जे सत्तेत आहेत ते राज्य घटनेमुळेच आले आहेत. मात्र, त्यांनी घटनेच्या मुलभूत तत्त्वांनाच तिलांजली दिली आहे, अशी टीका थोरात यांनी भाजपवर केली आहे.
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते असलेले बाळासाहेब थोरात यांनी प्रदेश कॉंग्रेसअध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर रविवारी ते प्रथमच शिर्डीला साईमंदिरात दर्शनास आले होते. दर्शन आटोपल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. साई मंदिरात थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, काँग्रेसचे डॉ एकनाथ गोंदकर, राष्ट्रवादीचे निलेश कोते, बाळासाहेब केरुनाथ विखे उपस्थित होते.
राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी शक्तींनी एकत्र यावं. लोकशाही वाचविण्यासाठी आणि ती चांगली, सदृढ राहावी, यासाठी मी शिर्डीत येऊन साईबाबांना साकडं घातलं आहे, असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे कॉंग्रेस आघाडीच्या ९ जागांना फटका बसला. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला विधानसभा निवडणुकीत सोबत घेण्यासंदर्भात विचार केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.