बारावीत नापास झाल्याने 3 विद्यार्थ्याची आत्महत्या
बारावीचा निकाल पाहिल्यानंतर खोली बंद करून एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मुकुंदवाडी परिसरात मंगळवारी दुपारी घडली. किरण गुलाब चव्हाण (१९, रा. मुकुंदवाडी परिसर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होताच, किरणने निकाल पाहिला. किती गुण मिळाले? याबाबत तिने कोणालाही काहीच सांगितले नाही. पालकांनीही तिला त्याबाबत विचारले नाही. त्यावेळी आई-वडील एका खोलीत जेवण करीत असताना किरण दुसऱ्या खोलीत गेली. तिने आतून दार लावून घेत गळफास घेतला. जेवण झाल्यानंतरही बराचवेळ किरण बाहेर न आल्याने वडिलांनी तिला आवाज दिला. पण, आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा वाजविला. शंका आल्यानंतर ते पत्रा उचकटून आत डोकावले. तेव्हा किरण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर दरवाजा तोडून नातेवाईक घरात गेले. त्यांनी किरणला खाली घेऊन तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर ही माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली. सहायक निरीक्षक वनिता चौधरी यांनी मृतदेह घाटीत नेला. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
बारावीमध्ये नापास झाल्याने आलेल्या नैराश्येतून एका विद्यार्थ्यांने शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे घडली आहे. आज संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. सौरभ बाळासाहेब लांडगे (वय-१८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
तिसरी आत्महत्या अकोला जिल्यातील अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे घडली . या ठिकाणी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.