MaharashtraEducationUpdate : राज्यातील शाळा , महाविद्यालये सुरु करण्याबाबत अशी आहे सरकारची भूमिका

मुंबई : कोरोनामुळे राज्यभरातील शाळा न उघडण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालये येत्या १ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय सांगितला होता. तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही राज्यातील जिल्ह्यांची कोरोनाची कोरोनाची स्थिती बघूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते . यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या २ ऑक्टोबरला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती योग्य वाटल्यास वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत योग्य ती नियमावली लागू करुन महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात असे म्हटले आहे.
येत्या २ ऑक्टोबरला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती योग्य वाटल्यास वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत योग्य ती नियमावली लागू करुन महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने घेण्यात येऊ शकतो – ना. @AjitPawarSpeaks pic.twitter.com/RXjBcciqV5
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 23, 2021
दरम्यान राज्यात आपण मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही लसींचे दोन्ही डोस घेऊन आपले लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहनही अजित पवारांनी केले आहे. लहान मुलांसाठी लस उपलब्ध करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्र सरकारने लसीला परवानगी दिल्यानंतर शालेय मुलांना लस देण्याचा प्रयत्न अग्रक्रमाने करण्यात येईल. जेणेकरून दिवाळीनंतर शाळा सुरू करणे सोयीचे होईल, अशी मानसिकता सरकारने ठेवली असल्याचे ही अजित पवार यांनी म्हटले आहे.
काही दिवसांआधी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही शाळा सुरु करण्याचे संकेत दिले होते. मात्र आता सणांच्यानंतर कोरोणचा प्रादुर्भाव बघूनच राज्यातील शाळा सुरु करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. तसंच राज्यातील कॉलेजेसमध्ये नवीन शैक्षणिक वर्षही १ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात येणार आहे. मुंबईत शाळा सुरु करण्याचा निर्णय सुद्धा येत्या दिवाळीनंतरच घेण्यात येईल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. अर्थातच राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतरच शाळा कधी सुरु करण्यात येईल हे ठरवले जाणार आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच शाळा सुरु कारंब्याचा निर्णय घेतला जाणार आहे.