CoronaMaharashtraNewsUpdate : जाणून घ्या आजची राज्याची कोरोनाची ताजी स्थिती

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ६३६ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ५ हजार ९८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर, ३७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ६३,००,७५५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०९ टक्के एवढे झाले आहे.
सध्या राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,८९,८०० झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३७८११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४९,९९,४७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८९,८०० (११.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,०३,१६९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४७,६९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
नागपुरात निर्बंध लागण्याची शक्यता
दरम्यान, नागपुरात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे उर्जामंत्री नितिन राऊत यांनी म्हटले आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात निर्बंध लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपुरातील स्थितीबाबत अधिक बोलताना नितिन राऊत म्हणाले, “रुग्णांची संख्या वाढते तेव्हा नवीन लाटेची चाहूल लागते. कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता. शहरामध्ये आणि ग्रामिण विभागामध्ये पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत. आतापर्यंत आकडेवारी एकेरी होती. मात्र आता ती दोन नंबरी झाली आहे. १३ पॉझिटिव्ह रुग्ण आज सापडले आहेत. तिसऱ्या लाटेने आपलं पाऊल जिल्ह्यामध्ये टाकलं आहे. त्यामुळे काही कडक निर्णय आम्हाला घ्यावे लागतील.”
नागपुरातील कोरोना निर्बंधाचे स्वरुप कसे असेल, हे सांगताना राऊत म्हणाले कि , “रेस्टॉरंटच्या वेळा आठ वाजेपर्यंत करण्यात येतील. तेसेच दुकानांच्या वेळा चार वाजेपर्यंच कराव्या लागणार आहेत. तसेच विकेण्डला शनिवार, रविवार बाजारपेठा बंद ठेवाव्या लागणार आहेत. उत्सवांच्या काळामध्ये गर्दी वाढू नये म्हणून आम्ही जनतेला आवाहन केले आहे. दरम्यान सर्व घटकातील, मीडिया, हॉटेल मालक आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन दोन ते तीन दिवसांमध्ये निर्बंध लागू करण्यात येतील, असे नितिन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.