Loksabha 2019 : राहुल गांधी यांचा दोन मतदारसंघातून लोकसभा लढण्याचा निर्धार
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशातील पारंपारिक अमेठी मतदारसंघातून त्यांचे नाव यापूर्वीच जाहीर झाले आहे. तसेच आता ते केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसकडून रविवारी पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर करण्यात आले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अॅन्टोनी यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढवण्याला राहुल गांधींनी सहमती दर्शवली आहे. अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा सुरु असताना अमेठीतील भाजपाचे उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी अमेठीतून जिंकण्याबाबत साशंक असल्यानेच दोन ठिकाणांहून लढण्याच्या विचारात असल्याचे म्हटले होते. पत्रकरांनी रविवारी हाच प्रश्न काँग्रेस नेत्यांना विचारल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला म्हणाले, मोदींबाबतही तुम्ही हेच म्हणणार का? गुजरातमधून जिंकून येण्यास ते साशंक असल्यानेच वाराणसीतून लढत आहेत का? इरानींचे हे विधान बालिश आहे मात्र, अमेठीत त्या पराभवाची हॅट्रिक जरुर करतील असा टोलाही त्यांनी लगावला.