MaharashtraNewsUpdate : मान्सूनची महाराष्ट्रात दमदार एंट्री !!

मुंबई : केरळमध्ये ३ जूनला आगमन झाल्यानंतर मॉन्सूनने गेल्या दोन दिवसात वेगवान प्रवास करीत महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. नैंऋत्य मोसमी वार्यांच्या अरबी समुद्रातील शाखेने जोरदार मुसंडी मारली आहे. दक्षिण कोकणातील हर्णेपासून सोलापूरपर्यंत मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गोव्यासह कोकणातील हर्णे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व लगतच्या मराठवाड्यातील काही भागापर्यंत मान्सून पोहोचला आहे.
चांगली बातमी मान्सूनची ..🌧🌧🌧
मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला.
मान्सून रेषा राज्यात, द.कोकणात हर्णे पर्यंत, द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाडा काही सलग्न भाग…
परीस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकुल..
IMD pic.twitter.com/L4ZmSbFlrb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 5, 2021
दरम्यान दक्षिणेकडील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे मागील आठवड्यात श्रीलंकेच्या आसपास मान्सूनचा वेग मंदावला होता. त्यामुळे केरळात मान्सून दाखल व्हायला तीन दिवस विलंब झाला. पण त्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग पकडला असून अवघ्या दोन दिवसांत मान्सून केरळातून महाराष्ट्रात धडकला आहे. हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजापेक्षा दोन दिवस आधीच मान्सूनने महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे याठिकाणी मान्सूनने आगमन केलं आहे. यानंतर मान्सून दक्षिण मध्य महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागाला मान्सून व्यापून टाकणार असल्याची सुधारित माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर ११ ते १५ जून दरम्यान पुणे आणि मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईकरांना मान्सूनच्या पहिल्या पावसाच्या आनंदासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
लक्षद्वीप आणि दक्षिण केरळात दाखल झालेला मान्सून पुढच्या काही तासांतच संपूर्ण केरळ आणि तामिळनाडूला व्यापत कर्नाटकच्या किनारपट्टीवर येऊन धडकला. यानंतर पुढील अवघ्या काही तासांत गोव्यासह कर्नाटकचा उर्वरित भाग, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि दक्षिण कोकणात मान्सूनने धडक मारली आहे. सध्या मान्सूनच्या आगमनाला पोषक वातावरण सध्या महाराष्ट्रात तयार झालं असून पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राला मान्सून व्यापून टाकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.