MaharashtraNewsUpdate : पदोन्नतीतील आरक्षण अध्यादेशाबाबत कुठलाच निर्णय नाही , संतप्त नितीन राऊत आणि काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या अध्यादेशावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कुठलाही निर्णय झाला नाही. राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय अध्यादेशाद्वारे जरी केला होता . यावरुन मागासवर्गीयांमध्ये संतप्त भावना असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्ष नाराज आहे. आज पदोन्नतीत आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र याबाबत कुठलाही निर्णय आज झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेले मंत्री नितीन राऊत यांच्यासह इतर महत्वाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.
या मुद्यावर आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत आज कोणताही निर्णय झालेला नसला तरी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित याबाबत बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत चर्चा करून घेणार निर्णय होणार आहे. दरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड , यशोमती ठाकूर हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर पोहोचले आहेत. आजच्या बैठकीत निर्णय न झाल्याने नितीन राऊत नाराज असल्याने ते माध्यमांशी न बोलताच निघून गेल्याचे वृत्त वाहिन्यांनी म्हटले आहे.
बैठकीत चर्चा झाली पण …
पदोन्नतील आरक्षण या विषयावर कॅबिनेट बैठकीत आज चर्चा झाली असली तरी या विषयावर आता समन्वय समितीत चर्चिला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाच्या विषयांवर समन्वय समितीत चर्चा होते. तिन्ही पक्षातील प्रमुख मंत्री या समितीत आहेत. या समितीत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील , शिवसेनेकडून सुभाष देसाई,अनिल परब आहेत.
दरम्यान पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडली. आज सकाळी नितीन राऊत म्हणाले होते की, “आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. तत्पूर्वी काँग्रेस पक्षाची बैठक होईल. या बैठकीत जो निर्णय होईल, तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वी पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे आणि ७ मे रोजी काढण्यात आलेला जीआर रद्द झाला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका असणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेही या बैठकीला उपस्थित राहतील. चर्चेतून जो निर्णय होईल त्यावरुन पुढची दिशा ठरवली जाईल.”