MaharashtraNewsUpdate : संभाजीनगर नाव द्या पण औरंगाबादला नव्हे तर …. : प्रकाश आंबेडकर

औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले असून या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे, दरम्यान काँग्रेस आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या मागणीला विरोध केला आहे.तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या नामांतराबाबत वेगळीच मागणी केली आहे.
आंबेडकर यांनी म्हटले आहे कि , ‘औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करा, ही राजकीय मागणी आहे. महानगरपालिका निवडणूक आल्यानंतर अशी मागणी नेहमी केली जाते. तसा औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा फार संदर्भ सापडत नाही. संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याचं नाव बदलून संभाजीनगर करा अशी आमची मागणी आहे,’ अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडला आहे.
उस्मानाबादचेही नाव बदलण्याची मागणी
दरम्यान, औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करा या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाच आता उस्मानाबादचेही नाव बदलून धाराशिव करा ही मागणी पुढे आली आहे. ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली असून या मागणीचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. मागणी मान्य नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.
‘निजामांनी धाराशिव हे नाव बदलून उस्मानाबाद ठेवले आहेय या उस्मानाबाद शहराची ग्रामदेवता धारसूर मर्दनी ही देवी असून तिच्या नावावरच धारसूर हे नाव पडले होते. पण ते निजामांनी बदलले असून ते आता पूर्ववत करावे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हे स्वप्न होते ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करावे,’ अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष दादा कांबळे यांनी केली आहे.