AurangabadCrimeUpdate : एकाच कुटुंबातील तिघांची हत्या , ६ वर्षीय मुलगा मात्र बचावला
अख्खं कुटुंब संपविण्याच्या उद्देश्याने हल्लेखोरांनी पती, पत्नी, मुलगी अशा घरातील तिघांचा धारधार शस्त्राने भोसकून खून केला. तर घरातील सहा वर्षाचा मुलगा मृत झाला असे समजून हल्लेखोराने सोडून दिल्याने सुदैवाने तो बचावला आहे. पैठण शहरालगत नाथमंदीरा पाठीमागील गोदावरी काठावरील जने कावसन गावात शनिवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पैठण हादरलं आहे. दरम्यान एकाच कुटुंबातील तिघांची का हत्या करण्यात आली, हत्येमागे हेतू काय आहे, याचा तपास पोलीस करत आहे.
राजू निवारे (वय 40) आश्विनी राजु निवारे (35) व मुलगी (10 ) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. हल्लेखोरांनी निवारे कुटुंबातील सहा वर्षाचा मुलगा सोहम निवारे याच्यावरही वार केला असून गंभीर अवस्थेत त्यास उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. पोलीस उप अधिक्षक गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, फौजदार छोटुसिंग गिरासे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी घटनास्थळास भेट दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी निवारे यांच्या घरातच हे हत्याकांड घडले आहे. संभाजी निवारे यांच्या जवळच्या नात्यात लग्न होते. शुक्रवारी ते शहरात जाऊन खरेदी करून आले होते. उशिरा रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले होते. त्यानंतर आज पहाटे शेजाऱ्या घराचे दार उघडले दिसले, त्यामुळे घरात डोकावून पाहिले असता तिघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.