IndiaCrimeUpdate : मुलाच्या हव्यासापायी चार मुलींचा गळा चिरून महिलेचा स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न
तिला मुलगा हवा होता पण लग्नानंतर चारही मुलीच झाल्या म्हणून मानसिक संतुलन बिघडलेल्या एका आईने आपल्या चारही मुलींची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप पतीने केला आहे. त्यानंतर तिने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला, असेही त्याने सांगितले. हरयाणाच्या पुन्हाना पोलीस ठाण्यातील पिपरौली गावात चार मुलींची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या आईवर करण्यात आला आहे. झोपेत असलेल्या मुलींची गळा चिरून हत्या केल्यानंतर तिने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तिच्या पतीने सांगितले. त्याने तक्रार केल्यानंतर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला गंभीर जखमी असून, तिला उपचारासाठी नल्हड मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे.
पोलिसांना तिच्या पटीने दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेचे मानसिक संतुलन बिघडले होते. हे तिचे दुसरे लग्न होते. पहिल्या पतीपासून तिला एक आणि दुसऱ्या पतीकडून चार मुली होत्या. या महिलेच्या पतीनेच तिच्याविरोधात तक्रार केली आहे. गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या घरी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी तो गेला होता. रात्री तीन वाजताच्या सुमारास तो घरी परतला. त्यावेळी त्याची पत्नी घरात तडफडत होती. त्याने आरडाओरड केली असता, ते ऐकून शेजारील काही जणांनी पोलिसांना कळवले. तर चार लहान मुली घरात मृतावस्थेत आढळून आल्या.
दरम्यान पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीला त्याने महिनाभरापूर्वी तिच्या मामाकडे सोडले होते. त्याला महिलेने विरोध केला होता. मुलगी आपल्याकडेच राहावी असे तिला वाटत होते. पतीने तिला मामाकडे पाठवल्यानंतर तिने अन्य चार मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती मिळाली आहे.