MaharashtraNewsUpdate : ताजी बातमी : मराठा समाजाला आंदोलन न करण्याचे आवाहन , मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आपली भूमिका

राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यातील मराठा समाजामध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला असून या मुद्द्यावरून विरोधी पक्षाकडून सरकारला जबाबदार धरले आहे. न्यायालयाच्या निकालामुळे निर्माण झालेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी अध्यादेश काढण्यासह वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी मराठा आरक्षणावर चर्चा करून येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि , सुप्रीम कोर्टाने मोठ्या घटनापीठाकडे जाण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र ती देताना अनपेक्षितपणे नोकरी आणि शिक्षणात कायद्याच्या अमलबजावणीला स्थगिती दिली असून त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही सभागृहाच्या विरोधी नेत्यांशी आज आपण यासंदर्भात चर्चा केली. काही दिवसांपूर्वी याचिका करणारे आणि त्यांच्या वकिलांशी चर्चा झाली. जी समिती नेमली आहे ती सुद्धा विविध तज्ञांसोबत चर्चा करत आहे. या बाबतीत आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या दिशेने आलो आहोत. विरोधी पक्षांशी चर्चा केल्यानंतर एका गोष्टीचं समाधान आहे ते म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा त्यांनी आम्ही सरकारसोबत आहोत हे वचन दिलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्व पक्षांनी एकमताने घेतला होता त्यामुळे आरक्षण देण्यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्द आहोत. आजच्या बैठकीत पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि त्याचसोबत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समजातील तरुण, तरुणींना काय दिलासा द्यायचा हादेखील प्रश्न होता. आम्ही सरकार म्हणून काही गोष्टी निश्चित केल्या आहेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , विरोधी पक्षातील नेत्यांशी बोललो तेव्हा त्यांच्याही सारख्याच सूचना आल्या आहेत. या सगळ्या सूचना एकत्र करुन उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करु. सर्व सूचना एकत्र करुन, कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन सरकार पुढील पाऊल टाकलं जाईल . आमच्या आधीच्या सरकारने जी वकिलांची टीम दिली होती त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. सरकार ऐकत नाही तेव्हा आंदोलन करायचं असतं. सरकार खंबीरपणे, ठामपणे तुमच्यासोबत आहे. कोणताही पक्ष आरक्षणाविरोधात बोलत नाही,” असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आंदोलन न करण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. तसंच न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करु असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आहे.