MahanayakOnline । AurangabadCurrentNewsUpdate । अत्यावश्यक खरेदीसाठी सम तारखेच्या वेळेत पोलीस आयुक्तांनी केला हा बदल…
औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज सुधारित आदेश जारी केले असून या आदेशानुसार उद्यापासून सम तारखेत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधेच्या वेळेत बदल करण्यात आला असून नवीन आदेशानुसार दुकाने आणि जीवनावश्यक सुविधा सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालू राहतील. तर वैद्यकीय सुविधा , अत्यावश्यक सेवा , आस्थापना , परवानगी देण्यात आलेले उद्योग व्यवसाय, राज्य व केंद्र शासनाचे अधिकारी , कर्मचारी , पेट्रोल पंप , एलपीजी गॅस, दूध व दूध डेअरी वाहतूक विक्री, हे सम – विषम तारखेला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि स्वस्त धान्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत.
दरम्यान तिसऱ्या लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी ४ मे २०२० ते १७ मे २०२० दरम्यान सम -विषम तारखेनुसार शहर बंद ठेवून सम तारखेला नागरिकांना सकाळी ७ ते ११ अशी सवलत दिली होती परंतु एक दिवस पूर्ण बंद आणि दुसऱ्या दिवशी चार तास शहर चालू ठेवल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा औरंगाबादकरांनी धुव्वा उडविला होता. हे लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी सुधारित आदेशात वरीलप्रमाणे नवीन बदल केले आहेत. या नवीन बदलानुसार पोलीस आयुक्तांनी आता नागरिकांना सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत सवलत दिल्यामुळे शहरात गर्दी होणार नाही , तसेच कामाशिवाय लोकांनी बाहेर पडू नये , बाहेर निघाल्यानंतर तोंडाला मास्क बांधावा असे आवाहन करण्यात आले आहे.