#CoronaVirusEffect : अजित पवार यांनी दिल्या आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा , डिजिटल जयंतीचे केले आवाहन….

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे कि , राज्यात करोनाचं संकट असून करोनाविरोधातील ही लढाई आता गंभीर वळणावर आली आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा आदर करून घराबाहेर पडू नका, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा घरीच आणि डिजिटलमाध्यमातून साजरी करा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन केलं. बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांचं, मानवतावादी शिकवणींचं पालन करून देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या, घरातच थांबून बाबासाहेबांची जयंती साजरी करुया, त्यांना अभिवादन करुया. घरी राहून जयंती साजरी करताना बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व करोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया. असं अजित पवार म्हणाले. करोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून ३० एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा असंही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे विचारवंत, कृतीशील नेते होते. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीत दिलेलं योगदान अजरामर राहणार आहे. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेनं जगण्याची ताकद दिली. बाबासाहेब त्यांच्या विचारांनं, कार्यानं महामानव ठरले आहेत. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच आपल्या सर्वांना पुढे नेतील, अशा शब्दांत त्यांनी बाबासाहेबांबद्दल आदर व्यक्त केला.