Corona Virus : जाणून घ्या कोरोना व्हायरस विषयी, कोरोनाच्या संसर्गापासून कसा बचाव कराल ?
जगभर कोरोनाने कहर माजवला असला तरी कोरोनाची भीती न बाळगता त्याच्या लक्षणांची माहिती करून घेतली पाहिजे. लक्षणांबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर विश्वास न ठेवता योग्य ती माहिती घेण्याची गरज आहे. कोरोना झालेल्या रुग्णामध्ये सरासरी ५ दिवसांत लक्षणे दिसत असल्याचं जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटलं आहे. कोरोना झालेल्या लोकांवर संशोधन करण्यात आल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काहींमध्ये कोरोनाची लक्षणे लवकर दिसतात तर काही लोकांमध्ये ही लक्षणे दिसण्यास उशीर होतो. कोरोनाचे निदान होण्यासाठी सध्या १४ दिवसांचा कालावधी लागू शकतो असे सांगण्यात येत आहे.
कोरोनाची लक्षणे
कोरोनाची लक्षणे सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच आहेत. कोरोना व्हायरसचं संक्रमण जलद होतं. ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, अशक्तपणा ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होतो. या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर १४ दिवसांनीही कोरोनाचा ताप आल्याचं तपासणीमधून समोर येतं. पहिल्या १४ दिवसांमध्ये तपासणी केली तर कोरोना असल्याचं कदाचित कळणार नाही पण २४ दिवसांमध्ये कोरोनाची टेस्ट पोझिटीव्ह येऊ शकते.
कसा पसरतो कोरोना ?
कोरोना विषाणू प्राण्यापासून पसरला असल्याचे सांगण्यात येत असले तरी सध्या जगभर चर्चेत आलेला कोरोना व्हायरस सर्दी, शिंका, खोकला यामुळे हवेतून संक्रमित होत असल्याचं समोर आलं आहे. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवा हात धरायलाच हवा. खरंतर करोनाच्या धास्तीनेच नव्हे तर अन्य वेळाही ही किमान काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून जंतूसंसर्ग टाळता येतो. न धुतलेल्या हातांनी डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करू नका. खाण्या-पिण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. साबण आणि पाण्याने २० सेकंद हात धुवायला हवेत. भरपूर पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. एकतर उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे पाणी भरपूर प्यावे. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक जाणं टाळा. प्रवास करायचाच असेल तर पुरेशी काळजी घ्या. मोठ्या प्रवासाऐवजी शक्यतो घरातच राहण्यास प्राधान्य द्या. इतरांशी शारीरिक संपर्क टाळा. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषधे घेऊ नका.
अशी घ्या काळजी…
कोरोनामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजाराला दूर ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे , हात वारंवार धुणे , शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रुमालाचा वापर करणे अशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. चीनसह इतर देशांमध्ये जिथं कोरोनाचा सर्वाधिक हाहाकार आहे त्या देशातून विषाणू पसरत आहेत. अनेक देशांमधील आरोग्य संस्थांनी लोकांना परदेश प्रवासानंतर लोकांमध्ये न मिसळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आता चीनसह १२ देशातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांचा १४ दिवसांपर्यंत पाठपुरावा करण्यात येतो. त्यातील एखाद्याला सर्दी, तापाची लक्षणे आढळल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करुन नमूने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवले जातात. त्यानंतर, नमुना निगेटीव्ह आल्यास त्या प्रवाशाला डिस्चार्ज दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.
मास्क लावण्याची गरज नाही…
नागरिकांनी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा, नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, विशिष्ट अंतरावरुनच इतरांशी संवाद साधावा, खोकतांना अथवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. अशा सूचना मोठ्या प्रमाणावर प्रसारित कराव्यात, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण न पसरता खबरदारी घेतली पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा हॉस्पिटलमध्ये विलगीकरणासाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आले असून त्या ठिकाणी पुरेशा साधन सामग्री उपलब्ध आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये बंदरे आहेत तेथे परदेशातून येणाऱ्या जहाजांवरील प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या.राज्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, बस, रेल्वे स्थानके, आठवडी बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याबाबत आणि कोणत्याही परिस्थितीत या विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. सामुहिक समारंभ, जत्रा, यात्रा यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये, असे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात यावे, अशी सूचना मुख्य सचिव यांनी केली.
राजधानी दिल्लीत करोना व्हायरसचे रुग्ण आढळून येताच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घालणं सुरू केलं आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात मास्कचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. फ्रान्समध्ये दोन हजार मास्कची चोरी झाल्याचंही समोर आलं. लोकांनी मास्क खरेदी करणं बंद करावं, मास्कविषयी जगभरात चर्चा सुरू असताना खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतची काही तथ्य सांगितली आहेत. WHO च्या मते, मास्कवर समोरील बाजूने हात लावू नये. जर हात लावला असेल तर तातडीने हात धुवावे. नाक, तोंड आणि दाढीचा भाग झाकला जाईल, अशा पद्धतीने मास्क घालावं. तुम्हाला संसर्ग झालेला नसेल तर मास्क घालण्याची आवश्यकता नाही. फोर्ब्सच्या अहवालात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. यूनिवर्सिटी ऑफ आयोवा कॉलेज ऑफ मेडिसिनमधील प्राध्यापक एली प्रेंसेविक यांच्या मते, मास्क घालण्याची आवश्यकता नाही. उलट मास्क वापरुच नये. तुम्ही तंदुरुस्त असेल तर तुम्हाला एन ९५ मास्क वापरण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असं त्या म्हणाल्या. ‘तंदुरुस्त लोक मास्क वापरल्यामुळे करोनापासून स्वतःला वाचवू शकतात, याचा अद्याप कोणताही शास्त्रीय आधार मिळालेला नाही. उलट मास्क चुकीच्या पद्धतीने घातल्याने धोका अजून वाढतो, कारण मास्कमुळे वारंवार तोंडाला हात लावावा लागतो. तुम्ही आजारी असाल तरच मास्क वापरा, जेणेकरुन तुमच्यापासून कुणाला संसर्ग होणार नाही. किंवा तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीची देखभाल करत असाल तेव्हा मास्क वापरा’, असा सल्ला एली प्रेंसेविक यांनी दिला.