Maharashtra Vidhansabha 2019 : २० भ्रष्ट मंत्र्यांपैकी काहींनाच तिकिटे नाकारली , हे कसले स्वच्छ सरकार ? : शरद पवार

मुख्यमंत्री सांगतात माझं सरकार पारदर्शक, निष्कलंक होतं. माझ्या सरकारवर कुणी आरोप केले नाही. मग धनंजय मुंडे यांनी २० मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले, त्यांच्यापैकी काहीना का उमेदवारीची तिकीटं नाकारली? ..अहो चोरी करणारा जज म्हणून बसला, तर निकाल काय लागायचा केसचा, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दौंड येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यावर टीका केली. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे, त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. म्हणून ज्यांच्या हातात ही सत्ता आहे त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यायची आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी पवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २० मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी तपासलं यात काही नाही. म्हणून आम्ही तिसऱ्या माणसाकडे तपासायला द्या, असे सांगितले होते. मात्र नाही तपासू दिली. यांनी जर चुकीचं काही केलं नसेल, तर मग मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना पुन्हा का तिकीट नाही दिलं? पाच मंत्र्यांना तिकीट पुन्हा का दिलं नाही, का त्यांना गाळलं? कुठेतरी काहीतरी गडबड आहे, म्हणूनच त्यांना तिकीट दिलं नाही ना. ज्यांना तुम्ही तिकीटं देवू शकत नाही. त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि आम्हाला सांगतात आमचं सरकार पारदर्शक, अहो यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा सवालही शरद पवार यांनी यावेळी केला.
राज्यात पाच वर्षापूर्वी आलेल्या सरकारला राज्यातील लहान घटकांची चिंता नाही. यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याउलट केंद्रसरकारने देशाच्या धनिष्टांचे कर्जाचे ओझे माफ करून ८२ हजार कोटींचे कर्ज फेडले. आज संपूर्ण देशात शेतीची अवस्था बिकट आहे, हे या राज्यकर्त्यांच्या नजरेत कसे येत नाही? असा संतप्त सवालही शरद पवार यांनी सरकारला केला. याचबरोबर दौंड विभागात आपण कारखानदारी उभी केली. याचा फायदा इथल्या लोकांना झाला. पण आजच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या धोरणामुळे इथल्या कामगारांना महिनोमहिने पगार मिळत नाही. यामुळे इथली अर्थव्यवस्था बिघडली आहे. तरीदेखील तुम्ही मतांचा जोगवा मागायला कसे येतात? असेही ते सरकारला उद्देशुन म्हणाले.
यावेळी त्यांनी समाज पुढे न्यायचा असेल तर स्त्री-पुरुष, तरुण असो, दलित,ओबीसी, आदिवासी या सगळयांना घेऊन पुढे जाता आले पाहिजे. हे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस करत आहे . मात्र हे काम भाजप करताना दिसत नाही. समाज सुधारण्याची वृत्ती ज्यांच्याकडे नाही, त्यांना आम्ही मताचा पाठिंबा देणार नाही. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे, असे सांगितले.