राष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच कोल्हापूर, सांगलीत बचावकार्य: CM
CM @Dev_Fadnavis took the stock of flood situation in Kolhapur, Sangli & Satara by an aerial survey with Ministers Chandrakant Patil, Girish Mahajan & Eknath Shinde. pic.twitter.com/LUdBC04Ybn
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2019
सांगली आणि कोल्हापूरमधील पुरस्थिती अतिशय गंभीर असून पूरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी पंजाब, गोवा, गुजरातमधून एनडीआरएफची अतिरिक्त पथकं मागविण्यात आली आहेत. एनडीआरएफ, लष्कर आणि नौदलाच्या मदतीने पूरग्रस्तांची सुटका करण्यात येत असून अनेक ठिकांनी पूरग्रस्तांना एअरलिफ्टने बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन करतानाच कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात राष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. कोल्हापुरात १८ गावांना पुराचा वेढा पडला असून या पुरामुळे २८ हजार लोक बाधित झाले आहेत. या पुरामुळे कोल्हापुरात चौघांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे ६७ हजार हेक्टर जमिनीवरील पीकं नष्ट झाली असून ऊसालाही धोका निर्माण झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी केली. तसेच अधिकारी आणि पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केलं. कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या मदतीसाठी पंजाब, गोवा आणि गुजरातमधून एनडीआरएफची अधिक कुमक मागवण्यात आली आहे. सांगलीत परिस्थिती अत्यंत गंभीर असून खराब हवामानामुळे सांगली दौरा रद्द करावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
२८ हजार लोक बाधित, ३ हजार घरे पडली
कोल्हापुरात मी स्वत: शिवाजी पुतळ्याजवळ जाऊन रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी केली. तसेच बोटीतून आलेल्या लोकांशी आणि संक्रमण शिबिरात असलेल्या लोकांशीची चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापुरात पुरामुळे १३० गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे २८ हजार लोक बाधित झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार ९२३ लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून ९७ हजार लोकांनी पूरस्थितीचा अंदाज घेऊन स्वत:हून गावं सोडली आहेत. १५२ ठिकाणचे ३८ हजार लोक नातेवाईकांकडे आश्रयाला गेले आहेत. या पुरामुळे कोल्हापुरात ३ हजार ८१३ घरे पडली आहेत. ८९ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. कोल्हापूरमध्ये पुरात ४ जणांचा मृत्यू झाला आहेत. त्यात दोघांचा पुरात तर इतर दोघांचा झाड अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती देतानाच ६० बोटींच्या सहाय्याने बचावकार्य सुरू असून एअर लिफ्टिंगही करण्यात येत असल्याचं ते म्हणाले.