राज्यातील विधानसभेच्या निवडणूक १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान -चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान होईल आणि १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल असा अंदाज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी येथील पत्रकार परिषदेत वर्तवला आहे. महिनाभरात बरीच उलथापालथ होईल आणि महायुतीच्या २५० जागा निवडून येतील असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागला. त्यानंतर महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे ती विधानसभा निवडणुकीची. ही निवडणूक कधी होणार? हे स्पष्ट व्हायचे होते कारण तशा तारखा जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या. आता मात्र चंद्रकांत पाटील यांनी १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होईल असं म्हटलं आहे.
सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसेची भूमिका काय असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. २०१४ मध्ये १५ ऑक्टोबरला मतदान झालं होतं. त्यामुळेच यावेळीही १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यानच विधानसभा निवडणूक होईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात फिर एक बार शिवशाही सरकार ही यात्राही काढण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात ही यात्रा काढली जाणार आहे. अब की बार २२० पार असा नवा नारा असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी याआधीच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.