Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू, महाराष्ट्राच्या दादांची अकाली एक्झिट…

Spread the love

पुणे : महाराष्ट्रासाठी आजची सकाळ काळ बनून आली. यात लोकांचे दादा म्हणून आपली छाप टाकलेले महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. राज्याला हादरवून टाकणार्‍या या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह या विमानात असलेल्या ५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिली आहे.

दरम्यान अजित पवार यानच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र कार्यकर्र्‍यांचा आक्रोश सुरु आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या दादाला राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानच्यासह देशभारतील मान्यवरांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

आज (२८ जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामती दौर्‍यासाठी निघाल्यानंतर बारामतीजवळ अजित पवार यांच्या विमानाचे लँडिंग होत असतानाच अकाळी ९ च्या सुमारास भीषण अपघात झाल्याचे वृत्त ब्रेक झाले आणि लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. सदर विमान लँडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला.

विमानाचा अपघात नेमका कुठे आणि कसा झाला?

अजित पवार कॅबीनेटच्या बैठकीसाठी ते मुंबईत आलेले होते, त्यानंतर आज ते आज सकाळी ते मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती मिळत आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात आदळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अजित पवार आज बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते, मात्र आज त्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर नेतेमंडळींना देखील अश्रू अनावर झाले.

राज्याच्या राजकारणात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अजित पवार यांच्याच नावे आहे. राज्याच्या अर्थ खात्याची धुरा सुद्धा त्यांच्याच खांद्यावर होती. प्रशासनावर पकड असलेला धुरंदर नेता, आपल्याला जे पटलं नाही ते बेधकडपणे बोलणारे दादा, कार्यकर्त्यांना जागेवर सुनावणारे दादा, राजकीय विरोधकांनाही त्याच भाषेत सुनावणारे दादा अशा एक नव्हे तर अनेक आठवणी महाराष्ट्राच्या राजकारणात दादांच्या व्यक्तिमत्वाने कोरल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात याना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार.

विमान लाँडिंग होत असतानाच अपघात

राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौर्‍यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जण होते. त्या सर्वाचा मृत्यू झाला.

दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त

अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चिलं गेलं आहे. त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे.

साडे चार दशकांपासून राजकारणात

अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली (प्रवरा) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. तेव्हापासून ते अखेरचा श्वास घेण्यापर्यंत ते राजकारणात सक्रिय राहिले. अजित पवार यांनी १९९१ पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

शरद पवारांच्या वाढदिनी एकत्र

पवार कुटुंबीयांचे वलय महाराष्ट्रासाठी नवीन नाही. गेल्या सहा दशकांपासून पवार कुटंबीयांचं गारुढ समाज आणि राजकारणावर राहिलं आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर त्याची दोन शकले झाली. त्यामुळे कुटुंबातही विसंवाद झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून झालं गेलं विसरून गेलं म्हणत अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय वादाची दरी कमी झाली होती. १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिनी अजित पवार एकत्र जमले होते. त्यानंतर बारामतीमध्ये झालेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमातही हे काका पुतण्या एकत्र आले होते. महानगरपालिका निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली होती. मात्र, काळाने घातलेल्या झडपेत या सर्व आठवणी आता भुतकाळात गेल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!