CongressNewsUpdate : काँग्रेसची 46 उमेदवारांची चौथी यादी जाहीर , मोदींच्या विरोधातील उमेदवार ठरला , महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश…
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 46 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना देशातील सर्वात व्हीआयपी सीट वाराणसीमधून उमेदवारी दिली आहे. अजय राय यांनी 2014 आणि 2019 मध्ये वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूकही लढवली होती. मात्र, दोन्ही निवडणुकांमध्ये अजय राय यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावेश असून, पहिल्या टप्पात मतदान होणाऱ्या नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.
देशपातळीवर काँग्रेसची ही चौथी यादी असून यात एकूण ४५ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या चौथ्या यादीत आसाममधील एक, अंदमान आणि निकोबारमधील एक, छत्तीसगडमधील १, जम्मू-काश्मीरमधील २, मध्य प्रदेशधील १२, महाराष्ट्रातील ४, मणिपूरमधील २, मिझोराममधील १, राजस्थानमधील ३, तामिळनाडूमधील ७, उत्तर प्रदेशमधील ९, उत्तराखंडमधील २ तर पश्चिम बंगालमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.
राज्यातील दुसऱ्या यादीत यांचा समावेश…
या यादीत आज काँग्रेसने महाराष्ट्रामधील नागपूर, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये नागपूरमधून आमदार विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे. तर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून डॉ. प्रशांत पाडोले यांना तर रामटेकमधून रश्मी बर्वे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तत्पूर्वी काँग्रेसने महाष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात काँग्रेसने नंदूरबारमधून जी. के. पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, पुण्यामधून रवींद्र धंगेकर, लातूरमधून शिवाजीराव काळगे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली होती. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अद्याप तोडगा निघालेला नाही. तसेच वंचितबाबतही मविआमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसने आपल्या वाट्याला येणाऱ्या जागांवरील उमेदवार निश्चित करून आघाडी घेतली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदींनी समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांचा 4.80 लाख मतांनी पराभव केला. शालिनी यादव यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या निवडणुकीत अजय राय यांना 1 लाख 52 हजार 548 मते मिळाली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून ६३.६२ टक्के मते मिळाली होती, तर अजय राय यांना १४.३८ टक्के मते मिळाली होती.
Congress releases the fourth list of 46 candidates for the upcoming Lok Sabha elections.
Congress leader Digvijay Singh to contest from Rajgarh Lok Sabha Constituency, UP Congress President Ajay Rai from Varanasi, Imran Masood from Saharanpur, Virender Rawat from Haridwar and… pic.twitter.com/wpnr6kvoUr
— ANI (@ANI) March 23, 2024
2014 च्या लोकसभा निवडणुकीत अजय राय यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि दुसऱ्या क्रमांकावर आले.
काँग्रेसने आतापर्यंत लोकसभेच्या 543 जागांपैकी 185 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने चौथ्या यादीत अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट दिले आहे. पक्षाने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना राजगडमधून, अरुण श्रीवास्तव यांना भोपाळमधून उभे केले आहे. लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये, काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील 80 लोकसभा जागांपैकी फक्त एक जागा जिंकली होती, रायबरेली, जिथून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी उमेदवार होत्या.