MumbaiNewsUpdate : सिने कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूबाबत प्राथमिक माहिती आली समोर …
मुंबई : प्रसिद्ध सिने कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी मृत्यूला जवळ केले. अद्याप त्यांच्या मृत्यूचे अधिकृत कारण समोर आलं नसलं तरी ठराविक मुदतीत पैशाची परतफेड न केल्यामुळे नितीन देसाई यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाई करण्यात येणार होती,असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. त्यामुळे देसाई हे आर्थिक विवंचनेत होते, त्यातूनच त्यांनी आत्त्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. १८० कोटींचं कर्ज न फेडल्याने नितीन देसाई चिंतेत होते, व्याजासह एकूण २५० कोटींचे देणे होते, असे या वृत्तात म्हटलेले आहे.
याबाबत एडलवाईस असेट रीकन्स्ट्रक्शन कंपनीने एन.डी स्टुडिओ जप्त करण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. मात्र रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नसल्याने अजून स्टुडिओची जप्ती झाली नव्हती. देसाई आणि त्यांच्या पत्नीने या कंपनीकडून कर्ज घेतले होते मात्र त्याची परतफेड झाली नसल्याने कंपनीने त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
देसाई यांच्या आत्महत्येबाबत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले की ,”आज सकाळी नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असून पोलीस सध्या याप्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत, असे रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी एका निवेदनात म्हटले आहे. देसाई यांना स्टुडिओसंदर्भात आर्थिक अडचणी असून ते आर्थिक ताणतणावात होते”.
नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येने मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.
नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.’1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.