MaharashtraPoliticalUpdate : उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीवरून प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय
२०२४ मध्ये पुन्हा भाजप आल्यास ते संविधान बदलू शकतात…
मुंबई : २०२४ मध्ये भाजपची सत्ता आली तर ते संविधान बदलू शकतात, केंद्र सरकारकडून विरोधकांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. उत्तर प्रदेशात बसपा किंवा चंद्रशेकर आझाद भाजपाला रोखू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी अखिलेश यादव यांच्या सहयोगी पक्षाला आंबेडकरवादी , पुरोगामी , मानवतावादी मतदारांनी मतदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
नरेंद्र मोदीच देशात कोरोना घेऊन आले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आणि आज काँग्रेसवर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि काँग्रेसने देशात कोरोना वाढवला असा अरोप केला होता. यावरूनही प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला ते म्हणाले कि , “पंतप्रधान सभागृहात खोटं बोलले, हे सुद्धा काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते सभागृहात बोलू शकले नाहीत, खरे तर देशात मोदीच कोरोना घेऊन आले.
उत्तर प्रदेशातील आंबेडकरवादी जनतेला आवाहन
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर आपलं म्हणणं मांडलं. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर बोलताना त्यांनी म्हटले आहे कि , “उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत जी लढाई दिसत आहे, ती समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही सपाला समर्थन देत आहोत. मी सर्व आंबेडकरवादी जनतेला देखील सांगत आहे, की उत्तर प्रदेशमध्ये सपाला मदत करा. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो. त्यामुळे आम्ही सपाला मदत करायचा निर्णय घेतला आहे.”
भाजप आरएसएस सोडून सर्वांशी युती
दरम्यान आगामी मुंबई महानरपालिकेच्या निवडणुकीबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली. मुंबई महापालिकेची निवणूक यावेळी आम्ही गांभीर्याने लढणार आहोत. युतीसाठी आम्ही सर्वांना दरवाजे उघडे ठेवले आहेत. फक्त भाजप आणि आरएसएस सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची आमची तयारी आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली.